⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

IMD Alert : राज्यात पुढचे ५ दिवस मुसळधार ; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होत असून राज्यात पुढचे ५ दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यासाठी राज्याच्या काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला. हवामान खात्याकडून पुढचे पाच दिवस पाऊस राहील अशी माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना आहेत.

दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा तर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावेल. उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळेल. त्यामुळे इथल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली इथे सध्या जोरदार पाऊस सुरू आहे, अशात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.