जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्हासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर येत्या ४ दिवसात पावसाचा इशारा जाहीर करण्यात आला आहे. कोकणासह महाराष्ट्रातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली आहे. यात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. उत्तर प्रदेशामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. येत्या ४ दिवसात मोठ्या प्रमाणावर पाऊस येण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने 18 ते 20 सप्टेंबर या काळात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने या भागातील जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट जारी केले आहेत. महाराष्ट्रातील नाशिक आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. पुण्यासह बहुतांश जिल्ह्यात अधिक पाऊस झाला आहे. मात्र, खरीप हंगाम अंतिम टप्प्यात येत असताना झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतीय हवामान विभागानं पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेज अलर्ट दिला आहे. तर, ठाणे, पुणे आणि रत्नागिरीसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना १७ सप्टेंबरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. १८ ते २० सप्टेंबर या काळात प्रामुख्यानं विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आणि मराठवाड्यामधील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं या भागातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केले आहेत.