⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

भाजपनं बेईमानी केली नसती तर…गुलाबराव पाटलांचा भाजपवर घणाघात

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । शिवसेना नेते आणि पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये बोलताना भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. जळगाव भाजपने लोकसभा निवडणुकीत चार बंडखोर उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यावेळी मी स्वत: भाजपकडे तक्रार केली होती. शिवसेनेविरुद्ध बंडखोर उमेदवार देऊन भाजपनं बेईमानी केली, असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केलाय.

इतकंच नाही तर त्यावेळी भाजपनं बेईमानी केली नसती तर ही वेळ आली नसती. पहिलं बेईमान कोण हे आधी भाजपनं तपासावं आणि मग बोलावं. पहिले ते बेईमान झाले नसते तर आज ते जसं म्हणत आहेत तसे उद्धव साहेब बेईमान झाले नसते, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी भाजपवर हल्ला चढवला.

तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेकडे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दिवाकर रावते यांसारखे निष्ठावंत असताना त्यांना मुख्यमंत्री का केलं नाही? असा सवाल केला होता. त्यावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. हा जर एकट्या शिवसेनेचा प्रश्न असता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. पण हा एकट्या शिवसेनेचा विषय नव्हता. सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पसंती दिली. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले, असं पाटील यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा होती. राजकारणात महत्वाकांक्षा असणं चुकीचं नाही. मात्र, त्यासाठी मुखवटा परिधान करणं चुकीचं आहे. उद्धव ठाकरे यांनी आता तो मुखवटा उतरावा आणि मान्य करावं त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीसांच्या या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जळगावातून प्रत्युत्तर दिलंय.