⁠ 
बुधवार, मे 15, 2024

बस अपघातानंतर मंत्री गिरीश महाजनांना वेगळीच शंका, नेमकं म्हणाले तरी काय?..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२३ । महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना आज पहाटे उघडकीस आली. ती म्हणजेच बुलढाण्यातील (Buldhana) समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, बस अपघातानंतर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी वेगळीच शंका बोलून दाखवली.

बसच्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. सुदैवाने वाहक-चालक या अपघातातून बचावले आहेत. ते सुखरुप आहेत. त्यांच्यावरच गुन्हा दाखल होईल. परंतु टायर फुटल्यानं अपघात झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र प्रथमदर्शनी तरी असं काही झालं असेल असं मला तरी वाटत नाही,’ असं म्हणत गिरीश महाजन यांनी अपघाताबद्दल शंका बोलून दाखवली.

बसच्या चालकाला डुलकी लागली असावी. त्यामुळेच बस लोखंडी खांब्याला धडकली. मग ती दुभाजकावर आदळली आणि नियंत्रण सुटून डाव्या बाजूला उलटली. बसच्या डाव्या बाजूला असलेली डिझेल टाकी फुटली. स्फोट झाल्यानं प्रवासी होरपळले, असं महाजन म्हणाले. बस जिथे पडली होती, त्या भागात रस्त्यावर डिझेल सांडल्याचं दिसत आहे, असं निरीक्षण महाजन यांनी नोंदवलं.

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर
दरम्यान, या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.