जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२४ । एकीकडे रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरु असून यातच राज्यात सातत्यानं बदलणाऱ्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान, दोन दिवसापूर्वी राज्यातील काही ठिकाणी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशातच शेतकऱ्यांची आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. हवामान खात्याने आजपासून पुढील तीन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जळगावातही गारपीटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय.
आज २८ फेब्रुवारी ते १ मार्च असे तीन दिवस खानदेश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि सोलापूर अशा १० जिल्ह्यात ढगाळ वातावरण सहित तुरळ ठिकाणी विजांच्या गडगडाटासह किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.यादरम्यान उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर अशा पाच जिल्ह्यात व त्या लगतच्या परिसरात आजपासून ते एक मार्चपर्यंत असे तीन दिवस गारपीटीची ही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील संपूर्ण 8 जिल्ह्यात आज 28 फेब्रुवारी ते 2 मार्च (बुधवार- शनिवार) असे 4 दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवार म्हणजेच 1 आणि 2 मार्च असे 2 दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत राज्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषतः कापणीसाठी तयार झालेल्या उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. हवामान विभागाने (IMD) पावसाचा इशारा दिला होता, मात्र नुकसान टाळता आलेलं नाही. अशातच आत राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.