⁠ 
सोमवार, मे 6, 2024

शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी! खतांच्या किमती महागण्याची शक्यता, ‘हे’ आहेत कारण?

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२३ । आधीच यंदा हवा तास पाऊस न झाल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. त्यात पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके करपू लागल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. दुसरीकडे पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यातच शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणारी एक बातमी आहे.

काय आहे कारण?
येत्या काळात खतांच्या (Fertilizer Price) किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण रशियातील कंपन्यांनी डायअमोनियम फॉस्फेटसारखी (DAP) खते भारताला सवलतीच्या दरात देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे वृत्त इकोनॉमिक टाइम्सने दिले आहे. त्यामुळं खते महागण्याची शक्यता आहे. याचा भार शेतकऱ्यांवर (Farmers) पडणार असून त्यांचा खर्च वाढणार आहे.

गेल्या वर्षी रशिया हा भारताला सर्वात मोठा खतांचा पुरवठा करणारा देश बनला होता. हा पुरवठा सवलतीच्या दरात केला जात होता. मात्र, यापुढे सवलतीच्या दरात खत मिळणार नसल्याने भारताला खत खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना देखील वाढीव किमतीत खत खरेदी करावे लागू शकते. सरकार यामध्ये शेतकऱ्यांना काही दिलासा देणार का हे पाहावे लागेल.

दुसरीकडे जागतिक स्तरावरील वाढत्या किमतीमुळे चीननेही खतांची निर्यात कमी केली. यामुळे जागतिक किमतीत वाढ होत असताना सबसिडीचा भार देखील वाढू शकतो.खतनिर्मिती क्षेत्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यापुढं रशियाच्या कंपन्यांकडून खते सवलतीच्या किंमतीत मिळणार नाहीत. 2022-23 या वित्तीय वर्षात भारताने रशियाकडून 4.35 टन खते आयात केली आहेत. या आयातीचे प्रमाण 246 टक्क्यांनी वाढल्याची माहिती त्या अधिकाऱ्याने दिली आहे.