⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

खडसेंनी गिरीश महाजनांवर शेरोशायरीतून लगावला टोला, वाचा काय म्हणाले?

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) विश्वासघात केल्याचा आरोप भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) करत आहेत. मात्र त्यानंतर एकनाथ खडसे गिरीश महाजनांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. खडसे यांनी महाजनांना शेरो शायरीतून टोला लगावला आहे. “हम तो शेर पर एहसान किया करते है, चुहे पे कभी नही, अशी शायरी गिरीश महाजनांचे नाव न घेता खडसेंनी केली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंनी विश्वासघात केल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला होता. मात्र हा विश्वासघात नसून हे राजकारण असल्याचा टोला यापूर्वीही एका कार्यक्रमात लगावला होता. काल जळगावात झालेल्या आणखी एका कार्यक्रमात त्यांनी शहरातील विविध विकासकामांमध्ये ‘नाथाभाऊ’ ची मेहनत आहे, याचे स्पष्टीकरण देतानाच पुन्हा एकदा गिरीश महाजनांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. ते म्हणाले,

हम तो शेर पर एहसान किया करते है
हम चुहे पे कभी एहसान नही करते
तुम्हारे जैसे दुसरो के पर हम नही काटते….

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले जळगावातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीने जिल्हा बँकेवर सत्ता स्थापन केली. भाजप नेते गिरीश महाजन यांनीदेखील निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. मात्र ऐन वेळी भाजपने बहिष्काराचे अस्र उगारत माघार घेतली. त्यामुळे जिल्हात अजूनही नाथाभाऊंचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर आगामी काळातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे पारडे जड झाल्यास गिरीश महाजन यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. आता जिल्हा परिषदेवरील सत्ता मिळवण्यासाठी भाजपला जोरदार मोर्चेबांधणी करावी लागत आहे.