⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

आता ‘या’ मुद्द्यावरून एकनाथराव खडसे फडणवीसांवर पुन्हा बरसले, म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्युज । १५ जुलै २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत एक असा प्रकार घडला की ज्या प्रकाराने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिठ्ठी देण्यात आल्याची घटना कॅमेऱ्याचा कैद झाले आणि त्यानंतर आता विरोधकांकडून जोरदार टीका सुरू आहे. त्यात मुद्द्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं आहे. एकमेकांना मदत करण्यासाठी, की एकमेकांचा इगो जपण्यासाठी या गोष्टी घडत आहेत, असा टोला खडसेंनी लगावला आहे.

तसेच बंडखोर आमदारांवरही त्यांनी टोला लगावला आहे. जर हे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटात सहभागी झाले असतील तर त्यांना आता मंत्रिपद मागण्याचं कुठलंही कारण नाही, त्यांनी हिंदुत्वासाठीच लढावं, असा टोलाही खडसे यांनी ५० आमदारांना लगावला आहे. ते जळगावच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

यापूर्वी या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या हातातून माईक घेतला होता. आता पुन्हा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शिंदेंना चिठ्ठी लिहून दिली. या गोष्टी नेमक्या एकमेकांना मदत करण्यासाठी घडत आहेत, की एकमेकांचा इगो जपण्यासाठी, हे आता सांगता येणार नाही. शिंदे गट व भाजप युतीतील सरकार पूर्ण क्षमतेने चालेल, त्यावेळेस नेमकं सांगता येईल, की कोण कोणाच्या इशाऱ्यावरून चाललंय, असंही एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं.

“हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सहभागी, तर मंत्रिपद कशाला हवं?”
शिंदे गटात सहभागी झालेले आमदार नेमके हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये सहभागी झाले आहेत, की त्याला इतर काही कारणे आहेत, हे नेमकं कळत नाही. मात्र जर हे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटात सहभागी झाले असतील तर त्यांना आता मंत्रिपद मागण्याचं कुठलंही कारण नाही, त्यांनी हिंदुत्वासाठीच लढावं, असा टोलाही एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाला जाऊन मिळालेला आमदारांना उद्देशून लगावला आहे.

हिंदुत्व फक्त सांगण्यासाठी आहे मात्र यांची बाहेर पडण्याची वेगवेगळे कारणे असू शकतात. यावरून आमदारांमध्ये एकमत नसल्याचीही बाब अधोरेखित होते, त्यांनी नेमकं कोणत्या मुद्द्यावरून ते केले आहे, ते स्पष्ट करावे असेही एकनाथ खडसे म्हणाले.