⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

वेदांत प्रकल्प गुजरात सरकारकडे वळवल्याने शिंदे सरकारवर एकनाथराव खडसेंची टीका!

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । जुलै महिन्यात शिंदे व फडणवीस सरकारने महाराष्ट्रात वेदांत ग्रुपला पुण्याजवळ तळेगाव येथे येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र शिंदे व फडणवीस यांनी परस्पर निर्णय घेऊन प्रकल्प गुजरात सरकारकडे वळवला असा आरोप विरोधी पक्षनेते करत आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जर परत हा प्रकल्प आपल्याकडे आणला तर ते गौरवस्पद होईल असे विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी केले आहे.

वेदांत प्रकल्पामुळे राज्याची जी आर्थिक उलाढाल आहे. त्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली असती. राज्याचा जीडीपी दर वाढला असता. प्रत्यक्ष उत्पन्न वाढले असते; लाखो तरुणांना यामुळे रोजगार मिळाला असता. मात्र हा प्रकल्प गुजरातकडे वळविल्याने या सर्वांपासून महाराष्ट्र वंचित राहणार आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास कारणीभूत ठरणारा वेदांत प्रकल्प गुजरातकडे वळविण्यात आल्‍याने महाराष्ट्रावर अन्याय असून राज्यासाठी मोठी दुर्देवी बाब असल्‍याी टीका आ. एकनाथ खडसे यांनी केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, की ते मोदींचे हस्तक असून काम करतोय. मात्र हस्तकाचे काम महाराष्टातील प्रकल्प गुजरातकडे वळविण्याचे नव्हे; तर तोच प्रकल्प इकडे आणला तर मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण महाराष्ट्र गौरव करेन असा निशाणाही एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर साधला. अजूनही वेळ गेलेली नाही. राज्य सरकारने प्रतिष्ठा पणाला लावून हा प्रकल्प पुन्हा राज्याकडे आणावा असेही खडसे म्हणाले.

सदर प्रकल्‍पासाठीची सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात हा असतांना प्रकल्प गुजरातकडे वळविला गेल्यात यात मोठे राजकारण असल्‍याचेही खडसे म्हणाले. अजूनही वेळ गेलेली नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय असून यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांची भेट घ्यावी’ असेही खडसे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर येत असून यावर विचारले असता खडसे म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यांचे मी स्वागत करतो मात्र हिंदू गर्जना यात्रेच्या निमित्ताने येताहेत की, स्थानिक आमदारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येत आहेत. विकासकामांचा भूमीपूजन करण्यासाठी येत आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ज्या कारणांसाठी येत आहेत त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आता मुक्ताईनगरचे असो की जिल्ह्यातील इतर रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत; अशी अपेक्षाही खडसेंनी व्यक्त केली.