⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

Eknath Shinde Updates : उद्धवसाहेब कुठेही दुखावले गेले नाही पाहिजे.., बंडखोर नेता झाला भावूक

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचा काल शेवट झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत अतिशय भावनिक साद घातली आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे एकत्र येत सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बातचित केली तेव्हा ते भावनिक झाले होते. सर्व घडामोडीत ‘उद्धवसाहेब (Uddhav Thackeray) कुठेही दुखावले गेले नाही पाहिजे’, असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दीपक केसरकर म्हणाले, काहीही झालं तरी उद्धव ठाकरे दुखावायला नको. ‘सत्तेसाठी आम्ही काहीही केलेलं नाही. मी खोटं बोलत नाही. आम्ही तात्विक भूमिका बाजूला न ठेवता हे सगळं घडलं पाहिजे. उद्धव साहेब कुठेही यात दुखावले गेले नाही पाहिजे. दहा – दहा लोकं जेव्हा एकावेळेला बोलतात, तेव्हा अपमान होऊ शकतो. स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. ते होऊ नये म्हणून काळजी घेतोय. कुणाचंही मन दुखवायचं नसतं. ते तथ्य आम्ही जसं पाळतो, तसं तुम्हीही पाळलं पाहिजे. तुम्ही जर सत्तेवर येत असाल, तर त्यांना थांबवलंही पाहिजे, असं म्हणत केसरकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

केसरकर पुढे म्हणाले कि, आम्ही तत्त्वांवर बोलतो. पवार साहेबांची आमची विचारांची लढाई आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जो लढा द्यायचा होता, तो दिला. सत्ता स्थापना करताना आम्हाला आमच्या नेत्याला दुखवायचं नाही. भावनांची कदर ठेवली पाहिजे. शिवसेना म्हटलं की बाळासाहेबांचा विचार येतो, ठाकरेंशी असलेलील बांधिलकी येते, प्रत्येक गोष्ट येते.. कुठलाही मनुष्य आपोआप मोठा होत नाही, असंही ते म्हणाले. तसेच भाजपच्या गोटात जो काही जल्लोष झाला, त्यांच्या नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया दिसल्या, त्याने दुखावले जाणारच ना.. आम्ही बंड राष्ट्रवादी, काँग्रेस विरोधात केलं होते, आमच्या नेत्याच्या विरोधात बंड केलेलं नव्हतं.. फडणवीस मॅच्युअर्ड राजकारणी आहेत. चुकीची स्टेटमेन्ट थांबली पाहिजेत, असं मतही त्यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : Big Breaking : फडणवीस सरकारच्या मंत्रिपदाची यादी ‘लीक’?, वाचा कुणाला मिळणार संधी!

सरकार स्थापनेबाबत दीपक केसरकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे मी आधी माझ्या लोकांशी बोलेन आणि त्यानंतर पुढची पावलं टाकेल असे म्हटले आहे. आमची बैठक गोव्यात आहे. आमचा गट नाही.. सरकार येतात, सरकार जातात. विचार कसा टिकवायचा, हा महत्त्वाचा भाग आहे. मंत्रिपदं असणारी लोकं कशाला बंड करतील.. केवळ याच्याकडे बंड म्हणून बघू नका.. केवळ सत्तेसाठी केलेलं हे बंड नाही.. पक्षात काही घडलं असेल, तर तो एक वेगळा विचार आहे.. शिंदे साहेबांसोबत चर्चा फक्त सरकारच्या स्थापनेबाबत होत नाही, असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे मुंबईत पोहचले असून देवेंद्र फडणवीस यांच्याशी सागर बंगल्यावर ते चर्चा करणार आहेत.