⁠ 
शुक्रवार, मे 10, 2024

बदली झाली कि पोलीस अधिकारी आकसापोटी आरोप करतात : एकनाथ खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची आक्षेपानंतर बदली केली जात असेल आणि त्यानंतर जर असे आरोप पोलीस अधिकऱ्याकडून होत असतील तर ते आकसापोटीही असू शकतात, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी परमबीरसिंह यांच्याविषयी दिली आहे.

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीरसिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. आता परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पत्र लिहिले असून, यात गृहमंत्र्यांवरच खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीरसिंह यांनी केला आहे.

याविषयी जळगाव येथे पत्रकारांनी एकनाथ खडसे यांना छेडले असता खडसे म्हणाले की, या प्रकाराबाबत मला माहिती नाही, परंतु हे मी टीव्हीवर पाहत आहे. याबाबत मंत्री देशमुख यांनी दिलेले उत्तरही मी ऐकले आहे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावर आरोप झाले अथवा त्याची बदली झाली की आकसापोटी असे आरोप ते करीत असतात मात्र, याबाबत चौकशी होऊन सत्य काय ते निश्चित बाहेर येईल.