⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

नवाब मलिक भाजपात गेले तर.. नेमकं काय म्हणाले खडसे??

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२३ । अंडरवर्ल्डशी संबध असल्याचं कथित प्रकरण आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांना अखेर दीड वर्षानंतर न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन दिला आहे. दरम्यान, नवाब मलिक जामीन मिळाल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटात जातील किंवा थेट भारतीय जनता पार्टीत (BJP) जातील, अशाही चर्चा सुरू आहेत. आता यावर राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले खडसे?
जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलतांना आमदार खडसे म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) यांचे नवाब मलिक यांच्यावर खूप उपकार आहेत. पवार यांनीच त्यांना राजकारणात अनेक संधी दिल्या आहेत. मलिक यांनीही खूप उत्तम काम केलं आहे. त्यामुळे मला वाटतं की नवाब मलिक हे शरद पवार यांच्याबरोबर राहतील.

दरम्यान, नवाब मलिक यांना भाजपाकडून ऑफर असल्याची चर्चा सुरू असल्याचा प्रश्न खडसे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ही गोष्ट येणारा काळच सांगू शकेल. यात एक गोष्ट मात्र नक्की आहे की नवाब मलिक हे जर भाजपात गेले तर तिथे जाऊन स्वच्छ होऊन ते बाहेर येतील. त्यामुळे एखाद्या वेळेस भाजपा त्यांना ऑफर देऊ शकते.

कारण भारतीय जनता पार्टीकडे लोकांना स्वच्छ करण्याची मशीन आहे. या पक्षाकडे वॉशिंग मशीनपेक्षाही भारी मशीन आहे. त्या मशीनमध्ये जर माणूस घातला तर तो स्वच्छ होतो. तो माणूस कितीही घाणेरडा असला, भ्रष्ट असला तरी तो त्यात घातला की स्वच्छ होतो, प्रामाणिक होतो. मग हे लोक त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करतात, त्याला मंत्रिमंडळात स्थान देतात असे नाथाभाऊ म्हणाले.