⁠ 
बुधवार, मे 1, 2024

सा.बां.विभागाच्या अधीक्षक अभियंत्याने केला कोट्यावधींचा गैरव्यवहार ; खडसेंच्या आरोपाने खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२३ । जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) एक हजार कोटींचे कामांमध्ये अडथळा निर्माण केल्याचा आरोप करत मंत्री गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंच्या निषेधाचा ठराव मांडला होता. आता त्याला प्रत्युत्तर देताना खडसे यांनी खडेबोल सुनावले आहे. तसेच यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सोनवणे यांच्याविरोधात अनेक पुरावे देत खडसेंनी गंभीर आरोप केले.

जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांची राज्य शासनासमोर ‘पत’ नाही. म्हणूनच शासकीय ठेकेदारांचे ३०० कोटींचे बिले शिल्लक आहे. या तीनही मंत्र्यांची पत असेल तर त्यांनी ठेकेदारांचे तीनशे कोटी आणून दाखवावेत, असे आव्हान त्यांनी दिले.

तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी जिल्ह्यात सुमारे २०० कोटींचा गैरव्यवहार केला आहे. तक्रार केल्यानंतर झालेल्या चौकशीत सोनवणे दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वीच जिल्ह्यातील मंत्र्यांकडून संबंधित यंत्रणेवर दबाव टाकण्यात येत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लोकायुक्त आणि औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याची माहिती आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रपरिषदेत दिली.

सोनवणेंनी शासकीय रकमेतून ३ महागड्या गाड्या नियमाला चिरडून खरेदी केल्या. या गाड्या कोण वापरतय, हेदेखिल तपासण्याची गरज आहे. १४ वर्षांपासून जळगावात सेवारत असणाऱ्या सोनवणेंनी नाशिक व जळगाव या दोन्ही पदांवर सेवारत राहून पगार उकळला आहे. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांची कामे सा.बा.विभागाकडून केले जात आहेत. त्यासाठी मंत्र्यांचे, काही आमदारांचे नातेवाईक, समर्थक ठेकेदारांचीच सोय केली जात आहे. सोनवणेंची बदली होऊनही त्यांना जाणीवपूर्वक संरक्षण देऊन जळगावातच ठेवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

गोद्रीचा हिशोब का देत नाहीत?
गोद्री येथे पार पडलेल्या ‘महाकुंभ’चा वारंवार खर्च मागूनही दिला जात नाही. या महाकुंभच्या नावाखाली आचारसंहिता असतानाही कुणाच्या परवानगीने हा निधी खर्च केला गेला, असा सवाल खडसेंनी केला.