⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

केंद्रीय कृषी अनुसधान परिषदेवर डॉ. दिनेश पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । दहीवद (ता.अमळनेर) येथील रहिवासी तथा दुर्ग (छत्तीसगड) येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ.दिनेश सुरेश यांची कृषी व किसान कल्याण मंत्रालयांतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेवर (आयसीएआर) निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती त्यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल केंद्रीय कृषिमंत्री संजय गर्ग यांनी केली आहे.

देशातील ९ कृषीतज्ज्ञ तथा संशोधक, शास्त्रज्ञांची या समितींवर निवड करण्यात आली आहे. गेल्या २२ वर्षापासून ते छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी वैज्ञानिक म्हणून कार्य करीत आहेत. त्यांचा जैविक शेतीसाठी प्रयत्न आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचे तंत्रज्ञान शोधत कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी त्यांचे संशोधन सुरू आहे. त्यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली आहे. कृषी अनुसंधान परिषदेतर्फे शेती व्यवसायाचे व धोरणाचे नव्याने नीती निर्धारण नियोजन व संशोधन करण्यात येणार आहे.

या समितीवर हैदराबाद येथील दोन,गांधीनगर,लखनौ,त्रिपुरा,प्रयागराज,नागपूर आणि छत्तीसगडमधून खान्देशातील सुपुत्र दिनेश पाटील अशा नऊ जणांची निवड करण्यात आली आहे.

संशोधन व धोरणांविषयी शेतकऱ्यांना आशा

डॉ.पाटील हे खान्देशातील असल्याने या भागातील शेतीच्या अडचणी, चातावरण, पावसाची स्थिती पाहून त्या दृष्टीने संशोधन होईल व शेतकऱ्यांना पुढील धोरणांची मदत होईल,अशी अपेक्षा आहे.