⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ठेवता आली नसती का? – राज ठाकरे

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२३ । मुंबई येथे नुकताच ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भर दुपारी हा सोहळा पार पडला. मात्र दुर्दैवाने या ठिकणी उपस्थितीत ११ नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का?

सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे