जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा शहरातील हॉटेल ‘भाग्यलक्ष्मी पॅलेस’ आणि हॉटेल दाजीबा पॅलेस येथे पावती फाडण्याच्या कारणावरून काही जणांनी जबरदस्तीने घुसून तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करून व्यापाऱ्यांना धमकावणाऱ्या या प्रवृत्तींमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, हॉटेलचे संचालक तुषार मराठे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली आहे.

काही व्यक्ती हॉटेल भाग्यलक्ष्मी पॅलेसमध्ये पावती फाडण्याच्या उद्देशाने आल्या होत्या. मात्र, मात्र मालक बाहेरगावी असल्यामुळे फोनवर बोलत असताना पावती फाडणाऱ्या या टोळक्याने रागाच्या भरात हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित पोलिसांना तातडीने कठोर कारवाईचे आदेश द्यावेत. जर व्यापारीच सुरक्षित नसतील, तर राज्याची प्रगती कशी होणार? एक मराठा समाजाचा तरुण उद्योग उभा करतो आणि त्याला अशा प्रकारे स्वकीयांकडूनच त्रास दिला जातो, हे दुर्दैवी आहे, अशी भावना तुषार मराठे यांनी व्यक्त केली.











