जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२५ । झारखंडमधील देवघर येथे एक भीषण अपघाताची घटना समोर आलीय. ज्यात कावड यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एका बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात १८ कावडींचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत आणि मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कावड यात्रेकरूंनी भरलेली ही बस बाबा बैद्यनाथ धाममध्ये जलाभिषेक केल्यानंतर दुमका येथील बासुकीनाथ मंदिराकडे जलाभिषेक करण्यासाठी जात होती. आज मंगळवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास ही बस मोहनपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जमुनिया परिसरात आली. त्यावेळी अचानक एलपीजी सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की बसचा अक्षरश: चक्काचूर झाला.

या अपघातात १८ भाविकांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाला. आवाज ऐकून स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. या अपघातातील जखमींना अपघातग्रस्त वाहनांमधून बाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान या अपघातातील सर्व प्रवासी बिहारमधील बेतिया आणि गयाजी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.










