⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024

हृदयद्रावक… ट्रकच्या चाकाखाली आल्याने आईसह दहा वर्षीय चिमुकल्‍याचा मृत्‍यू

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ ।  दुचाकीने चंदन बर्डी (जळू) येथे जिल्हा परिषद शाळेत जात असताना राष्ट्रीय महामार्गावर पसरलेल्या खडीवर दुचाकी घसरली. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने शिक्षिका व तिचा मुलगा ठार झाल्याची घटना आज सकाळी एरंडोल ते धारागीर दरम्यान घडली. दुचाकीचालक शिक्षिका कविता कृष्णकांत चौधरी, (वय ३७ ) व  मागे बसलेला त्यांचा मुलगा लावंण्य (वय १०) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

 

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका कविता चौधरी ह्या मुलगा लावण्यला दुचाकी (एमएच १९ डीबी ८७७९) ने दररोजप्रमाणे घेवून शाळेत जात होत्या. यादरम्यान, आज सकाळी १० वाजेच्या सुमारास मुलाला घेवून सोबत जात असतांना ट्रक ट्राला (जीजे २६ टी ८२६४) ने धडक दिली. यात माय लेकांचा मागच्या चाकात येवून जागीच मृत्यू झाला.

 

अपघाताची माहिती कळताच एरंडोलचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, अकिल मुजावर, संदीप सातपुते, मिलिंद कुमावत, पंकज आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरीकांच्या मदतीने मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले.

उद्यापासून जळगावातील १४ व्यापारी संकुलने बेमुदत बंद ; ‘ही’ मार्केट असणार बंद

0

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ । महापालिकेच्या १४ व्यापारी संकुलातील गाळेधारक शुक्रवार (ता. ५)पासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महापालिका मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिला. 

 

दरम्यान, महापालिका उपायुक्तांनी पुन्हा मार्केटला भेट दिली. त्यांनी गाळेधारकांना पैसे भरण्यासाठी ८ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. डॉ. सोनवणे म्हणाले, की संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त प्रशांत पाटील यांनी बोलविले. गाळेप्रश्नी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अधिवेशनानंतर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत कारवाई करू नये, असे संघटनेतर्फे आयुक्तांना सांगण्यात आले होते. मात्र, मनपा प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने १४ मार्केटमधील दुकाने बंद करून दुकानदार आंदोलन करणार आहेत. त्या वेळी मनपाचे अधिकारी कारवाईसाठी आल्यास काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास मनपा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला.

राज्यात एकूण २७ महापालिकेचे मार्केट आहेत. त्यातील सर्व मार्केटमधील गाळेधारकांचे नूतनीकरण व जुने भाडे व इतर करांचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, जळगाव मनपाद्वारे तब्बल २५० पट दंड लावला आहे. त्यामुळे प्रत्येक गाळेधारक ही रक्कम भरू शकत नाही. सर्वांना सवलती देतात. मग गाळेधारकांवरच सक्ती का, असा प्रश्नही या वेळी उपस्थित केला.

 

शहरातील महापालिकेच्या मालकीची अविकसित आणि अव्यवसायिक १४ मार्केट शुक्रवारपासून बेमुदत बंद राहणार आहेत. त्यात रामलाल चौबे मार्केट, भोईटे मार्केट, जुने बी. जे. मार्केट, डॉ. आंबेडकर मार्केट, वालेचा मार्केट, छत्रपती शाहू मार्केट, शिवाजीनगर दवाखान्याजवळील दुकाने, महात्मा गांधी मार्केट, भास्कर मार्केट, गेंदालाल मिल कॉम्प्लेक्स, श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानजवळील मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट, जुने शाहू मार्केट, धर्मशाळा मार्केटचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्याची मुद्दाम बदनामी केली जातेय; पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील

0

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ । जळगाव येथील आशादीप महिला वसतिगृहातील अत्याचारप्रकरणाचा मुद्दा सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलच गाजत आहे. विरोधी पक्षाने या घटनेवरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे. दरम्यान, वसतिगृहात कुठलाही गैरप्रकार घडलेला नसून असल्यामुळे या माध्यमातून जळगाव जिल्ह्याची मुद्दाम बदनामी केली जात असल्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील सभागृहात म्हणाले आहे.

 

जळगाव शहरातील महिला वसतीगृहात झालेला प्रकाराची वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यात बातम्या आल्या. मी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. परंतू असा प्रकार झालेला नसून आमचा मतदार संघ असलेला जळगाव जिल्ह्याची मुद्दाम बदनामी केली जात असल्याचेही ना.पाटील म्हणाले आहे.

 

या प्रकरणी गृहमंत्र्यांनी उच्च अधिकार्‍यांच्या समितीद्वारे चौकशी केली असता हे प्रकरण घडलेच नसल्याचे समोर आले. या प्रकरणी ज्या महिलेने आरोप केले तिच्या विरूध्द १७ वेळेस तक्रारी करण्यात आल्या आहेत. ती मनोरूग्ण असल्याचे आधीच समोर आले असून तिने केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

तशी कोणतीही घटना घडलीच नाही ; जळगाव महिला वसतिगृह प्रकरणी गृहमंत्र्यांची क्लीन चीट

0

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ । जळगाव येथील मुलींच्या आशादीप शासकीय वसतिगृहात पोलीस कर्मचाऱ्यांनी मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. 

 

दरम्यान,  विरोधी पक्षाने या घटनेवरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले होते. मात्र तशी कोणतीही घटना घडलीच नाही असं म्हणत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगाव शासकीय वसतिगृह प्रकरणी क्लीन चीट दिली आहे.

 

याप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी शासनाकडून महिला अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. सदर महिला अधिकाऱ्यांनी सादर कलेला अहवाल गृहमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवला आहे. यावेळी पोलीस अधिकारी महिला वसतिगृहात आत जाऊ शकत नाहीत असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

आशादीप महिला वसतिगृह प्रकरण : खाकीतल्या गिधाडांना कठोर शिक्षा करा

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ ।  जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. 

याबाबतची तक्रार सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. पीडित महिलांनी दिलेल्या माहितीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

 

दरम्यान, या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून वसतिगृहात मुलींबाबत झालेल्या गैरप्रकाराच्या चौकशीस सुरुवात झाली आहे. महिला अधिकाऱ्यांच्या समितीने तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितीने तक्रारदार महिलेसह संबधितांचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. लवकरच याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येणार असल्याची माहिती घोडमिसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

 

दरम्यान, भाजप आमदार श्वेता महाले यांनीही याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “जळगावमध्ये अतिशय निंदनीय घटना घडली आहे. जळगावच्या आशादीप वसतिगृहात अशी घटना घडणे खूप चुकीचं आहे. कर्मचाऱ्यांकडून मुलींना कपडे काढून नाचायला सांगतात हे अतिशय निंदनीय आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. हे कृत्य करायला नकार देणाऱ्या महिलांना मारझोड केली जाते. या आरोपींवर कडक कारवाई करावी आणि सरकारने दखल घ्यावी. आपली सुरक्षा करणाऱ्या लोकांकडून अशी घटना होते ते खूप दुर्दैवी आहे” असं आमदार श्वेता महाले म्हणाल्या.

महिला वसतिगृह परिसरातील रहिवाशांचे रात्री १० वाजता इन कॅमेरा जबाब नाेंदवले

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ ।  शहरातील शासकीय आशादिप महिला वसतिगृहात महिला व मुलीच्या चौकशीच्या नावाखाली अनैतिक कृत्य व गैरव्यवहार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, वसतिगृहातील प्रकाराची चाैकशी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी रात्री १० वाजेच्या सुमारास भेट दिली.

 

त्यांनी परिसरातील रहिवाशांचे इनकॅमेरा जबाब घेतले. दाेन महिला पाेलिस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्यासाेबत हाेते. पाेलिस पथकाने वसतिगृहासमाेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीअारही चाैकशीसाठी ताब्यात घेतले.

 

दरम्यान, शहरातील शासकिय वसतिगृहातील महिलांना भेटायला येणाऱ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे ते बाहेर गर्दी करतात आणि त्याचा त्रास आम्हा रहिवाशांना होतो. त्यामुळे हे वसतिगृह या भागातून हलवावे, अशी मागणी संबंधित शासकिय महिला वसतिगृहाच्या परिसरातील नागरिकांनी केली आहे. महिलांचे जळगाव शहरातील शासकिय वसतिगृह अचानक चर्चेत आले आहे.

त्या प्रकरणात चार महिला अधिकाऱ्यांची समिती चौकशी करीत असून त्यानंतर वास्तव समोर येण्याची शक्यता आहे.

एरंडोलमध्ये २१ वर्षीय तरुणाची आत्महत्या ; परिसरात खळबळ

0

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ ।  । येथील गांधीपुरा, महादेव मंदीर परिसरातील रहिवासी २१ वर्षीय तरुणाने मंगळवारी (दि.२) उशिरा रात्री कडूनिंबाच्या झाडाला दोर बांधून गळफास घेतला. किरण धनसिंग पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुनील घरी न आल्यामुळे वडील धनसिंग पाटील त्याचा शोध घेतला. गालापूर शिवारातील शेतात किरणने कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. ही घटना समजताच प्रा. मनोज पाटील यांनी नगरसेवक बबलू पैलवान याना सोबत घेत घटनास्थळ गाठले.

 

काही वेळाताच पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे हेदेखील पोहोचले. किरणला रिक्षाने ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील, डॉ. मुकेश चौधरी यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. बुधवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत चेतन पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून एरंडोल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. हवालदार विकास देशमुख, राजू पाटील पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत महिलेची आत्महत्या

0

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२१ । जळगाव शहरातील रामेश्‍वर कॉलनी भागातील रहिवासी असणार्‍या ५५ वर्षीय महिलेने धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडलीय. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली असून विमलबाई काशिनाथ चौधरी (वय५५, रा. रामेश्‍वर कॉलनी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.  

 

सविस्तर असे की, विमलबाई चौधरी या शहरातील रामेश्‍वर कॉलनीतील राहतात. दरम्यान, आज त्यांनी आसोदा रेलवेगेट ते भादली दरम्यान रेल्वे खांबा ४२१/२३-२५ च्या मध्ये धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन पार्थिव जिल्हा रूग्णालयाकडे रवाना केले.

 

दरम्यान, मयत महिलेच्या पश्‍चात पती, मुलगा, दोन विवाहित मुली आहेत. हे कुटुंब भाजीपाला विक्रेते म्हणून काम करत होते. या महिलेने नेमकी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली याचे कारण अद्याप समजले नाही. दरम्यान, शनिपेठ पोलिसांनी याचा पंचनामा केला असून याबाबत नोंद करण्याचे काम सुरू होते.

सुसाईड नोट लिहून एरंडोलच्या १६ वर्षीय तरुणीची आत्महत्या

0

जळगाव लाईव्ह न्यूज | ३ मार्च २०२१ | एरंडोल पंचायत समितीमध्ये कनिष्ट अभियंता असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या दहावीत शिक्षण घेत असलेल्या सोळा वर्षीय मुलीने सरकारी निवासस्थानात गळफास घेवून आत्महत्या केली.

रोहिणी हरिभाऊ चंदनकर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान, रोहिणी हिने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.

याबाबत असे की, आशालता वानखेडे ह्या पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानी परिवारासह राहतात. आशालता वानखेडे ह्या मंगळवारी (ता. 2) नेहमीप्रमाणे कार्यालयात गेल्या होत्या. सायंकाळी घरी आल्यानंतर त्याना त्यांची सोळा वर्षीय मुलगी रोहिणी हरिभाऊ चंदनकर हिने डोक्याला बांधण्याच्या फेट्याचा कापड घराच्या छताला असलेल्या पंख्याला बांधून गळफास घेतलेल्या दिसून आली. त्यांनी आरडाओरड करताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली.

नागरिकांनी रोहिणी हिस ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.मयत रोहिणी चंदनकर हिने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. माझ्या मृत्यूबाबत कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये असा मजकूर चिठ्ठीमध्ये आहे.

याबाबत विजय रामचंद्र वानखेडे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र पाटील, अनिल पाटील करीत आहेत.