जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना जाहिर केलेली नुकसान भरपाई केवळ धूळफेक आहे. अजूनही मदत न दिल्याने खोटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे,’ असा हल्लाबोल भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.
भाजपा कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत खासदार उन्मेष पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.त्यात ते बाेलत हाेते.
खासदार पाटील म्हणाले, राज्यात ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतजमिनीवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात १०० लाख हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवरील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. राज्यात ठाकरे सरकार मात्र हेक्टरी दहा हजार रूपये मदत देवून शेतकऱ्यांची फसवणूक करीत अाहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अद्याप एक कवडीही मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदाची दिवाळी काळी ठरणार आहे.
पीक विमा योजनेंतर्गत करोडो रुपयांचा विमा हप्ता भरला जात असला तरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. त्याचे निकष राज्य सरकारने बदलल्याने हे सरकार विमा कंपनीसाठी की शेतकऱ्यांसाठी काम करते? असा सवाल खासदार पाटील यांनी केला. १४७ कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम केवळ २८ कोटी रुपयेच मिळाली. याआधी भाजप सरकारच्या काळात ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. सरकार केवळ कंपन्यांच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोपही उन्मेष पाटील यांनी केला.