जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून आज भाजपने संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचं आरक्षण गेल्याचा आरोप करत भाजपने संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला आहे. दरम्यान, आज जामनेरमध्येही भाजपने जोरदार निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी आरक्षणाची मागणी करीत ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ओबीसींच्या हक्कासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय राज्यात पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींसाठी निवडणुका होत आहेत. त्यामुळे ओबीसी समाज प्रचंड संतापला आहे. ओबीसींच्या प्रशासकीय हक्कांवर गदा आणण्यासारखे असून या अन्याया विरोधामध्ये भारतीय जनता पक्ष ओबीसींच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. या संदर्भात आज तहसीलदार अरूण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा कार्यालयापासून जामनेर तहसीलपर्यंत ओबीसींच्या न्याय व हक्कासाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व जामनेर तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी केले असून यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण अबाधित राहावे यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसींच्या पाठीशी आहे. जो पर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा भाजपने घेतला.