जळगाव लाईव्ह न्यूज । मध्य रेल्वेच्या ‘शून्य भंगार’ उपक्रमाला भुसावळ विभागाने उल्लेखनीय प्रतिसाद देत महसूल निर्मितीत आघाडी घेतली आहे. भुसावळ विभागाने भंगार विक्रीतून तब्बल ९७ कोटी ७२ लाख रुपयांची कमाई करत जळगाव जिल्ह्यासह खान्देशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एकूण ४०४ कोटी ७२ लाख रुपयांचा महसूल भंगार विक्रीतून मिळवला असून, मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये सुमारे २.८१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. २०२४-२५ मधील याच कालावधीत ३९३.६५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

वापरात नसलेल्या साहित्याचे उत्पन्नक्षम मालमत्तेत रूपांतर करण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने व्यापक मोहीम राबवली. स्टोअर्स विभागाने कुर्ला कटिंग यार्ड, ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप (नाशिक), परळ वर्कशॉप, मनमाड वर्कशॉप तसेच विविध विभागांतील दुर्गम ठिकाणी साचलेले भंगार शोधून त्याची नियोजनबद्ध विल्हेवाट लावली.

या सुसंघटित प्रयत्नांमुळे केवळ महसूल वाढला नाही, तर जागेचा कार्यक्षम वापर आणि स्वच्छता मोहिमेलाही चालना मिळाली आहे. भंगार व्यवस्थापनाच्या बाबतीत भुसावळ विभागाची कामगिरी मध्य रेल्वेत सर्वाधिक ठरली असून, पुढील काळातही अशीच गती कायम ठेवण्याचा प्रशासनाचा मानस आहे.







