⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

बालकवी पुण्यतिथी : कालचक्रात हरपलेला निसर्ग सौंदर्याचा पुजारी ‘बालकवी’

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे १९१८. वेळ संध्याकाळ ६ ते ६.३० दरम्यानची. मध्य रेल्वेच्या भादली रेल्वे स्टेशनवर हाहा:कार उडाला होता. एक इसम रेल्वेखाली येवून अपघात झाला होता. क्षणात त्याच्या देहाची लक्तरे झाली होती. काही ओळखीच्या लोकांनी त्यांची ओळख पटवली. आणि लक्षात आले, मराठी साहित्याचा एक राजहंस छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडला होता. निसर्गाला शब्दरुप देणारा शब्दप्रभू ‘बालकवी’ हरपला होता. निसर्गाला पडलेलं एक गोड स्वप्न क्षणार्धात असं मातीमोल झालं होत. कालचक्रात निसर्ग सौदर्याचा पुजारी हरपला होता. त्यांच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला आणि मराठी साहित्य पोरकं झालं होतं.

ही घटना ऐकशे चार वर्षापूर्वीची. आपल्या २८ वर्षांच्या उण्यापु-या आयुष्यात केवळ १६३ कविता लिहून (४० प्रकाशित तर १२३ अप्रकाशित) मराठी साहित्यात ज्यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं होतं त्या बलकवींची अर्थात त्र्यंबक बापूजी ठोमरे यांची स्मृती-शताब्दी होवून चार वर्षे झाली आहेत. औदुंबर, श्रावणमास, फुलराणी, आनंदी आनंद गडे, पारवा, तू तर चाफेकळी या कवितांनी रसिकांना भूरळच पाडली. त्यांचं गारुड आजही मराठी रसिकांच्या मनावरुन उतरलेलं नाही. प्राथमिक शाळेपासून ते थेट महाविद्यालयीन आणि विश्वविद्यालयीन अभ्यासक्रमात त्यांची कविता अभ्यासली गेली. अभ्यासली जात आहे. त्यांचा ‘औदुंबर’ अजूनही आपल्या गुढतेचं रहस्य स्वतःत दडवून आहे. अनेकांनी त्यांच्या कवितेवर पीएच.डी. केलंय. यातच त्यांच्या कवितेची वैश्विकता दडली आहे.

बालकवींचा मृत्यू हा अपघात की आत्महत्या यावर खूप चर्चाही झाली. १९६२ ला मौज तर्फे प्रकाशित कृ.भा.मराठे यांच्या ‘बालकवी’ या ग्रंथात हा निव्वळ एक अपघात होता असं म्हटले आहे. तर १९६६ मध्ये प्रकाशित भा.ल.पाटणकर यांच्या ‘समग्र बालकवी’ या ग्रंथानुसार ती एक आत्महत्या होती असे म्हटले आहे. अपघात असो की आत्महत्या ? मराठी साहित्यासाठी व रसिकांसाठी तो काळाने त्यांचेवर उगवलेला एक सूड होता असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

बालकवींचा जन्म १३ ऑगष्ट १८९० ला धरणगांवी झाला. येथील विठ्ठल पंत शुक्ल यांची कन्या गोदुबाई ह्या बालकवींच्या आई. त्यांचे वडील बापूजी देवराम ठोमरे हे येथेच फौजदार म्हणून नोकरीला होते. येथील जैन गल्लीतल्या त्यांच्या मातुलगृही त्यांचा जन्म झाला होता. पुढे ते एरंडोल, नगर, पुणे येथे जात येत राहीले. याच काळात त्र्यंबकने आईकडून भक्ती, काव्य, रसिकता आणि भावनिकता घेतली. जी पुढे त्यांच्या जगण्यात व काव्यातही वारंवार दिसून आली. १९०७ साली जळगावात भरलेल्या काव्यसंमेलनात रेव्ह.टिळक, कवी विनायक, नना फडणीस यांच्या उपस्थितीत व डाॅ.का.र.किर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली १७ वर्षीय त्र्यंबकने कविता म्हटली आणि सा-यांनी त्यांना ‘बालकवी’ पदवी बहाल केली. रेव्हरंट टिळकांकडे काही काळ वास्तव्य करुन, मिशनरी शाळेत शिक्षकाची नोकरी करुन ते काव्य लेखनासाठी पुन्हा खान्देशात परतले होते.

अपघात झाला त्या दिवशी ते त्यांची मोठी बहिण जिजींकडे भादलीला होते. त्या दिवशी त्यांचे जळगावचे मित्र आप्पा सोनाळकर यांची त्यांना एक तार आली. त्यात “आई आली रे भाऊ, आई आली. लवकर निघून ये !” असा निरोप होता. ही आई म्हणजे रमाई. जीच्याबद्दल बालकवींना एक वेगळेच आकर्षण होते. जीला ते कधीही भेटले नव्हते. मात्र जिच्या ठायी पत्नीचे सौदर्य व मातेची वत्सलता एकाच व्यक्तीमत्वात अनुभव घेतायेईल अशी ती त्यांची ध्येय देवता होती.(बालकवी-मौज, पृष्ठ ८८/८९). या रमाईची भेट एका उशिरा हाती पडलेल्या पत्रामुळे एकदा हुकली होती. त्याची हुरहुर त्यांना अस्वस्थ करी. त्या पत्राला बालकवींनी ‘स्वर्ग दारावरचे पारपत्र’ असे संबोधले होत. आज त्यांना ही भेट हुकू द्यायची नव्हती. ते जळगावला पोहचण्यासाठी भादली गावातून रेल्वे स्टेशनकडे निघाले.

साधारण तीन मैलावर असलेल्या स्टेशनवर जाण्यासाठी ते पायवाटेने निघाले. स्टेशनच्या कॅबिन जवळ ते पोहचले. तेथल्या तार कुंपणातून रेल्वे रुळांजवळच्या अरुंद पायवाटेने आपल्याच तंद्रीत चालू लागले. स्टेशन समोर दिसत होते. भूसावल कडून येणारी गाडी शिटी वाजवत होती. गाडीचा आवाज, शिटीचा आवाज त्यांना जणू ऐकूच येत नव्हता. त्यांच्या डोक्यात काही वेगळाच विचार चालू होता. आडव्या तारा, रस्ता, पायवाट, खडी, फिशप्लेट त्यांच्या गावीही नव्हते. आणि रुळ ओलांडतांना त्यांच्या पायातला जोडा रुळात अडकला. भरधाव गाडी जवळ आली. आणि त्या अजस्त्र धुडाने त्या कोमल, सुकमार जिवाला धडामदिशी उडवले. त्या अंत्य समयी त्यांच्या विचारात पत्नी पार्वतीबाई होत्या की त्यांच्या ध्येय देवता रमाई ? हे कोडं कोडंच राहिलं . कधीही नं उलगडण्यासाठी. हे वृत्त जळगाव स्टेशनवर त्यांचे मित्र आप्पा सोनाळकरांना कळले. ते त्यांना न्यायलाच स्टेशनवर आले होते. ते तडक घटनास्थळी पोहचले. साश्रू नयनांनी त्यांनी छिन्नविछिन्न अवयव गोळा केले. बालकवीच्या सद-याच्या खिश्यात घड्याळ टिकटिक करत सुरू होते. बालकवींची एक कविता जणू ते गुणगुणत असावे.

घड्याळातला चिमणा काटा,
टिक टिक बोलत गोल फिरे.
हे धडपडते काळीज उडते,
विचित्र चंचल चक्र खरे !

बालकवींच्या जीवनाचं चक्र थांबले होते. मात्र, घड्याळाचे चक्र सुरुच होते. जणू काळ कुणासाठीही थांबत नाही हेच ते यातून सांगू पहात होते. काळ पुढे सरकत राहिला. शतक ओलांडून गेला. या काळावर बालकवीने लिहलेली अक्षरं पुसली गेली नाहीत. ती अमिट ठरली, अविट ठरली. ती आजही तळपत आहेत, लख्ख तेजाने. पिढ्यानपिढ्यांचं साहित्यिक मुल्य जपत.
बालकवींचा जन्म झाला ते धरणगांव आणि मृत्यू झाला ते भादली यात ४० किमी.चे अंतर आहे. राज्यातील आणि देशभरातून हजारो काव्य रसिक या ठिकाणी भेट देतात. मात्र, दुर्दैव असे की या दोन्ही ठिकाणी त्यांचं भव्य असं स्मारक नाही. धरणगांवी १२ कोटीचे स्मारक प्रस्तावित आहे. जे कोरोनामुळे रखडले आहे. तर, भादलीला बालकवींच्या जन्मशताब्दी निमित्त बनवलेले लहानश्या स्मारकाचे रेल्वेच्या विस्तारीकरणात नुतनीकरण झाले आहे. मराठी कवितेला ज्यांनी आपल्या हळव्या, सुंदर शब्दकळेने चंदेरी-सोनेरी साज चढविला त्यांच्या नशिबी जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही अवहेलना यावी याहून मोठी शोकांतिका नाही. ही खंत त्यांच्या स्मृती-शताब्दी वर्षाततरी दूर झाली नाही ही काव्यप्रेमींची उपेक्षा. भविष्यात तरी त्यांच्या लौकिकाला साजेल असे बहुउपयोगी स्मारक लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात साकारतील अशी आशा बाळगायला काय हरकत आहे.

image
बालकवी पुण्यतिथी : कालचक्रात हरपलेला निसर्ग सौंदर्याचा पुजारी 'बालकवी' 1

© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, धरणगाव.
जि.जळगाव. ४२५१०५.
(९४२३४९२५९३)