⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

बिबट्या समोर येताच माऊलीने घेतली नदीत उडी, १३ तास पुराच्या पाण्यात वाहत राहिल्यावर वाचला जीव!

Chopada News-जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२२ । चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील लताबाई बाविस्कर (वय ५५) यांना शेतात काम करत असताना ४ वाजले. त्या घरी जाण्यासाठी निघाल्या त्याचवेळी एक कुत्रा त्यांच्या दिशेने पडत आला आणि कुत्र्याच्या मागे बिबट्याही दिसला, काय करावे काहीच कळेना कारण.. एकीकडे काटेकुटे आणि दुसऱ्या बाजूला तापी नदी, जायचे तरी कुठे ? शेवटी लताबाई बाविस्कर यांनी हिम्मत पक्की केली आणि नदीत झोकून दिले, तब्बल १३ तास पुराच्या पाण्यात वाहत, तब्बल ६० किलोमीटर अंतरावर जाऊन दुसऱ्या दिवशी नीम गावात नदीच्या काठावर पोहचली. येथील नागरिकांनी दवाखान्यात प्रथमो पचार करून लताबाईंना घरी नेण्यात आले.

घटना घडली अशी की, लताबाई बाविस्कर (वय ५५, कोळंबा. चोपडा ) या शेतात काम करुन घराकडे परतत असताना त्यांना एक कुत्रा त्यांच्या दिशेने पडत आला आणि कुत्र्याच्या मागे पाहिले असता बिबट्या जणू कुत्र्याच्या शिकार करण्यासाठी ढरकाळी फोडून येत होता ते पाहून लताबाई धस्स झाले. काय करावे काहीच कळेना कारण.. एकीकडे काटेकुटे आणि दुसऱ्या बाजूला तापी नदी, जायचे तरी कुठे ? शेवटी लताबाईने हिम्मत पक्की केली. जे होईल ते होईल पण प्रयत्न करायलाच हवं म्हणून, नदीकडे धाव घेतली. त्या पडत असल्याने बिबट्या त्यांच्याकडे पाहत होता. त्या भीतीत लताबाईंनी तापी नदीत झोकून दिले. त्यांना पोहता येत होते त्यांनी हातपाय हलवायला सुरवात केली. मात्र तापीच्या प्रवाहात वाहू लागल्याने तिने प्रसंगावधान राखून तिने लागलीच पुरात वाहून आलेल्या केळीच्या खांबाला धरले. नाकातोंडात पाणी जात होते, दम लागत होता. तरीही लाराबाई त्या केळीच्या खोडाआधारे तग धरून होत्या.

तब्बल १३ तास पाण्यात वाहत, पोहत लताबाई तब्बल ६० किलोमीटर अंतरावर जाऊन दुसऱ्या एका गावात नदीच्या काठावर पोहचली. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता नावाडी आला आणि त्याने आवाज देऊन लताबाईची विचारपूस केली. अनेक तास पाण्यात असल्याने त्वचा नरम झाली होती. थंडीने त्या कुडकुडत होत्या नावाड्याने गावात जाऊन खबर दिली. साडी रुमाल आणला, गावातील लोक आले. आणि मग तिला कळले की, आपण अमळनेर तालुक्यात निम गावाला पोहोचलो आहोत. नाव-गाव आणि घडलेली हकीगत सर्वांना सांगितली. सुदैवाने निमगावातच लताबाईंचा भाचा होता. त्याने त्यांना ओळखले. दवाखान्यात प्रथमो पचार करून लताबाईंना घरी नेण्यात आले. त्या मृत्युंजयी ठरल्या आणि त्यांची ही थरारकथा पंचक्रोशीत मोठी आश्चर्याची आणि चर्चेचा विषय ठरली.