⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

Maharashtra Politics : खडसे आमदार होताच राज्यपालांना देणार नवीन १२ आमदारांची यादी, वाचा कुणाची लागणार वर्णी

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर होती. भाजप सत्ता स्थापन करणार असे वाटत असतांनाच महाविकास आघाडी झाली आणि भाजपला विरोधात बसावे लागले. महाविकास आघाडीकडून १२ आमदारांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे देण्यात आली होती. राज्यपाल नियुक्तांच्या यादीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंचे (Eknath Khadse) नाव असल्याने हि यादी मंजूर केली जात नसल्याचे म्हटले जात होते. नुकतेच राज्यातील सरकार कोसळले असून भाजप-शिंदे गटाकडून संभाव्य नवीन १२ आमदारांच्या निवडीसाठी यादी राज्यपालांना देण्यात येणार आहे. बदललेली सत्तेची समीकरणे आणि कुणाचीही नाराजी होऊ नये याअनुशंगााने सर्वतोपरी काळजी घेऊनच ही यादी राज्यपालांकडे सपूर्द केली जाणार आहे. शिंदे गट, भाजपा याच बरोबर घटक पक्षाला देखील समोर ठेऊन ही यादी तयार केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

शिवसेनेत पडलेल्या उभ्या फूटनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. गेल्या अडीच वर्षापासून महाविकास आघाडी सरकारने दिलेली राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी आजही प्रलंबित होती. आता सरकार बदल झाल्यानंतर या आमदारांच्या निवडीसाठी पोषक असलेल्या सरकारची स्थापना झाली असल्याने १२ आमदारांच्या निवडीचा प्रश्न मार्गी लागेल असे चित्र आहे. त्यामुळे राज्यपालाच्या माध्यमातून निवडले जाणारे १२ आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे विधानपरिषदेवरील त्या एका जागेवर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा आता रंगू लागली आहे. उद्याच्या विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारकडून नवी यादी राज्यपालांना देण्यात येणार आहे.

२०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच तीन पक्षाने मिळून १२ आमदारांच्या निवडीसाठी यादी ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचाकडे पाठवली होती. मात्र, गेल्या दीड वर्षात हा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला नव्हता. अनेकवेळा या यादीमुळे भाजपावर आणि कोश्यारी यांच्यावर टिकाही झाली. मात्र, आजही तो प्रश्न कायम आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे नाव असल्यानेच ही यादी प्रलंबित ठेवण्यात आली असल्याचे म्हटले जात होते. नुकतेच राज्यात शिंदे सरकारची स्थापना झाली आहे. आमदारांच्या संख्येत भर पडण्याच्या अनुशंगाने या संभाव्य आमदारांची यादी राज्यपालांकडे दिली जाणार असून गेल्या अडीच वर्षापासून रखडेलला प्रश्न आता तरी मार्गी लागेल असा आशावाद आहे.
हे देखील वाचा : शिवसेनेच्या सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर पाळणार कि टाळणार?

राज्यपालांकडून विधानपरिषदेवर १२ आमदारांची निवड केली जाते. महाविकास आघाडीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलेली यादी गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित आहे. नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार असून शिंदे सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीचाही राजीनामा दिल्याने ती जागा एक अशा १३ आमदारांची निवड होणार आहे. विधानपरिषदेला भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्या नावाची केवळ चर्चा झाली. आता पुन्हा त्यांच्या नावाची चर्चाच होणार का पक्ष त्यांचेही नाव पुढे करणार हे पहावे लागणार आहे. सध्या एकानाथ शिंदे हे मुख्यमंत्री असले तरी यामध्ये भाजपाच्याच आमदारांची संख्या जास्तीची असणार आहे. यामध्ये सदाभाऊ खोत, माधव भांडारी,विनायक मेटे, चित्रा वाघ, राजेश क्षीरसागर यांच्यासह आठवले गटातील एक अशी नावे चर्चेत आहेत.

राज्यपालांकडून नवीन यादीला मंजुरी मिळणारच यात शंका नाही असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. नवीन यादीत भाजप पक्षाचे आणि त्यांच्या घटक पक्षातील उमेदवारांचीच अधिकची नावे असणार आहेत. आठवले गटासह इतरांनाही संधी देण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तर शिंदे गटातून काही नावे समोर येतील का हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.