जळगाव लाईव्ह न्यूज । उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे काल २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या दुर्देवी घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून कार्यकर्ते अन् नेत्यांच्या डोळ्यातून अश्रुंचा बांध फुटला होता.दरम्यान आज बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बारामतीच्या ज्या मातीने त्यांना घडवलं, त्याच मातीत आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी प्रचंड जनसागर लोटला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते.

एक पर्व संपले!
‘दादा गेले’ ही भावना आजही अनेकांना पचनी पडत नाहीये. बारामती अन् महाराष्ट्र आज खऱ्या अर्थाने पोरका झाला. अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जन समुदाय बारामतीकडे लोटला. लाडक्या दादांना निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. आपल्या लाडक्या दादाला शेवटचं पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. वृद्ध असो वा तरुण, महिला प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. अजित पवार अमर रहे… दादा परत या.. असा नेता पुन्हा होणे नाही…एक पर्व संपले, अशा भावना उपस्थित लोकांच्या होत्या.

दरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नितीन गडकरी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, राहुल नार्वेकर, रितेश देशमुख, सुनील तटकरे, झिशान सिद्दीकी, अमोल मिटकरी, सुशिलकुमार शिंदे, आदिती तटकरे, प्रफुल्ल पटेल, गिरीश महाजन, जयकुमार गोरे यांच्यासह राज्यातील अनेक नेते अन् कार्यकर्ते दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.









