⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत लवकरच अंतिम निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । राज्य सरकारने पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याची तयारी केली असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

पुढे बोलतांना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात सध्या पाचवीपासून पुढील वर्ग सुरु आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात पहिली ते चौथीचे वर्ग बंद आहेत. पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करावेत यासाठी शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे. पहिली ते चौथीचे वर्ग सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन सुरु करण्यास परवानगी द्यावी, यासंदर्भात चाईल्ड टास्क फोर्सनं देखील मत मांडलं आहे. आता आरोग्य विभागाने देखील यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याबाबत आदेश जारी केली जातील. यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि कॅबिनेटला आहे.

राज्यात सध्या ७०० ते ८०० रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर देखील चांगला आहे. त्यामुळे पालकांनी शाळा व्यवस्थापनावर विश्वास ठेऊन मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात संमतीपत्र द्यावं, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावं, असे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.