जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२४ । महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील तापमान चाळीशी पार गेल्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र अशातच आजपासून राज्यातील जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.

राज्यात हवेची द्रोणीय परिस्थिती निर्माण झाली आहे, अर्थात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी जिल्ह्यासह राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून या बदललेल्या स्थितीमुळे पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगाव जिल्ह्यात ५ ते ७ एप्रिलदरम्यान तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.

जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातही काही भागांत पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. तापमान ४० अंशांवर गेले आहे. अशातच आर्द्रताही वाढल्यामुळे जळगावकरांना उन्हाच्या चटक्यांसह उकाड्याचाही सामना करावा लागतो आहे; परंतु शुक्रवार ते रविवार या दरम्यान जिल्ह्यात काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत तापमान दोन अंशांनी घसरू शकते.







