⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

सत्यमेव जयते फार्मर कपमध्ये डांगर बु।। च्या जय योगेश्वर शेतकरी गटाला राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२३ । महाराष्ट्रातील शेतकरी गटांमध्ये शाश्वत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पाणी फाउंडेशनामर्फत २०२२ मधील खरीप हंगामासाठी ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. राज्यातील १८ जिल्ह्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून, स्पर्धेत १५१६ पेक्षा जास्त शेतकरी गट स्पर्धेत सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांनी गट शेती केल्यामुळे उत्पादन खर्च कमी येईल. तसेच शेतकऱ्यांच्या अनेक समस्या कमी होतील, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अभिनेता आमिर खानने सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेची घोषणा केली होती. एकजूट, ज्ञान, श्रमदान आणि स्पर्धा या मुद्दयांवर आयोजित या स्पर्धेत ४० हजार शेतकऱ्यांनी आपल्या दीड हजार गटांच्या माध्यमातून या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मका, ज्वारी, तूर, भाजीपाला, सोयाबीन, कापूस, कांदा, मूग, उडीद अशा विविध २६ पिकांचे उत्पादन या गटांनी आपापल्या गावात घेतले.

पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२२’च्या पुरस्कार वितरण आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली. या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील डांगर बु।। च्या जय योगेश्वर शेतकरी गटाला राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार मिळाला आहे. या शेतकरी गटात सतीलाल वाघ, राकेश पाटील, पवन नेरकर, राकेश वाघ, समाधान पाटील, प्रविण पाटील, भटू महाराज, विजय पाटील, भगवान पाटील, उमेश पाटील आदी शेतकऱ्यांचा समावेश होता. या शेतकरी गटाच्या यशाबद्दल डांगर बु।। चे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.