जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । जिल्हा पोलीस दलाच्या अमळनेर शाखेने मोठी कारवाई केली आहे. एक चारचाकीतून तब्बल ८ लाख २ हजार ५०० रुपये किमतीचा ५३ किलो गांजा जप्त केला आहे.

जळोद कडून अमळनेरकडे येणाऱ्या चारकीतून ८ लाख २ हजार ५०० रुपये किमतीचा ५३ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे १७ नोव्हेंबरच्या रात्री गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली.जळोदहुन अमळनेरकडे येणाऱ्या चारकीतून गांजाची अवैध वाहतूक होत आहे.

हिरे यांनी तात्काळ डीवायएसपी राकेश जाधव यांना माहिती देऊन हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील, मिलिंद भामरे, दीपक माळी, रवींद्र पाटील, सूर्यकांत साळुंखे, चालक सुनील पाटील यांना घेऊन जळोद रस्त्यावर विजय नाना कृषी महाविद्यालयाजवळ सापळा रचून ५३ किलो गांजा यासह चारचाकी, मोटरसायकल व मोबाईल असा सुमारे १२ लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केल्याची घटना आज मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास जळोद रोडवर घडली.
पोलीस वाहनाच्या प्रकाशात कारमधून उतरणारा आरोपी सराईत गुन्हेगार तौफिक शेख मुशिरोद्दीन (रा. गांधलीपुरा) हा असल्याची ओळख पटली. त्याच्यासोबत आणखी तीन अनोळखी आरोपी देखील पळून गेले. पोलिसांनी कारची डीक्की उघडली असता त्यात तीन गोण्यांमध्ये ८ लाख २ हजार ५०० रुपये किमतीची ५३ किलो ५०० ग्रॅम वजनाची २५ गांजाची पाकिटे आढळून आली. तसेच आरोपीनी सोडून दिलेली मोटरसायकल, दोन मोबाईल असा एकूण १२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.








