
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच ते नंदुरबारला आले. यावेळी त्यांनी खान्देशातील जनतेची मन जिंकली. भाषणात ते चक्क अहिराणी बोलले. यावेळी ते म्हणाले कि, खान्देशना लोके पक्का दिलदार शेतस, मूठभर लेतस आणि तगारीभर देतस.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणाची सुरुवातच अहिराणीतून केली. ‘रामराम, कसा सेतस बठ्ठा, दिवाळी कशी गयी जोरमा, खान्देशना लोके पक्का दिलदार शेतस, मूठभर लेतस आणि तगारीभर देतस,’ असे म्हणताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर “नवापूर औद्योगिक वसाहतीसाठी १३२ केव्ही वीज उपकेंद्रासाठी तत्काळ जागा उपलब्ध करून देण्यासोबतच आदिवासी समाजातील कुपोषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे शिंदे म्हणाले.

नंदुरबार नगरपालिका इमारतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले होते. यावेळी त्यांच्यासोबत नंदूरबारचे पालकमंत्री विजयकुमार गावित, भाजप खासदार हिना गावित, खनिकर्म मंत्री दादा भुसे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. शिंदे यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आले.







