जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व देवेन हॉटेल यांच्या सौजन्याने बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी, व्यापारी, हमाल व मापाडी कामगार यांच्या सेवेसाठी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर अन्नछत्र योजना अल्पदरात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. २५ रुपयांत एक भाजी, तीन पोळ्या किंवा पाच पुऱ्या, अशा या योजनेचे स्वरूप आहे.
बाजार समितीत आल्यानंतर शेतकरी बांधवांना जेवणासाठी बाहेर लागणारा खर्च लक्षात घेऊन त्यांच्यासाठी अल्पदरात अन्नछत्र म्हणून बाजार समितीने या याेजनेचा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून कामगार देखील आनंदात आहेत.
या याेजनेमुळे आमदार किशोर पाटील व बाजार समितीचे मुख्य प्रशासक तथा माजी आमदार दिलीप वाघ, सर्व प्रशासकीय संचालक रणजीत पाटील, चंद्रकांत धनवडे, प्रा.एस.डी. पाटील, प्रवक्ते खलील देशमुख, नाना देवरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. याेजनेसाठी भगवान मिस्तरी यांचे सहकार्य लाभत आहे.
नुकतेच या याेजनेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी बाजार समिती सचिव बी.बी. बोरुडे, उपसचिव प्रतीक ब्राम्हणे, लिपिक बालवीर सिंग शीख, रोहित देशमुख, व्यापारी सुभाष अग्रवाल आदी उपस्थित होते. सर्वसंबंधिताना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बाजार समितीने केले आहे.