जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी आहे. त्यानिमित्ताने माँ भटाई ग्रुप तर्फ़े जळगाव शहरातील अयोध्या नगर भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माँ भटाई ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरात 19 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माँ भटाई ग्रुपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, उदघाटक म्हणून जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, मनोज चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

माँ भटाई ग्रुपतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव दोन दिवस म्हणजे 19 आणि 20 फेब्रुवारी साजरा केला जाणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे भव्य पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री भव्य अशी वाजत गाजत जल्लोष मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर 20 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार शाळकरी मुलांपर्यंत पोहचावेत म्ह्णून 5 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, शाहीर आलंम वाघणेकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा पोवाडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच शिव जन्मोत्सवानिमित्त गरिबांना अन्नदान, चरित्र वाचन अशा विविध कार्यक्रमांचे अयोजन करण्यात आले असून हे सर्व कार्यक्रम शासनाने घोषित केलेल्या कोविड नियमावलीला अनुसरून घेतले जाणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी माँ भटाई ग्रुपतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन माँ भटाई ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले आहे.
हे देखील वाचा:
- शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी जामनेरचे भाजप नेते संजय गरुडांना अटक ; जळगाव शिक्षण वर्तुळात खळबळ
- जळगावात चातुर्मास पर्वाला आजपासून प्रारंभ
- यावल-सावखेडा मार्गावर धोकादायक फांद्या छाटा व फलक लावा; ॲड. देवकांत पाटलांची PWD कडे मागणी
- जळगाव जिल्ह्यावासीयांसाठी खुशखबर! गिरणा धरणाची जलपातळी ८६ टक्क्यांवर पोहोचली!
- यावल आयटीआयमध्ये विविध पदांसाठी भरती; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी











