शिवसेनेत नसल्याचा दावा करणाऱ्या नगरसेविकेची शिवसेनेच्या तंबूत बसून महासभेला उपस्थिती

फेब्रुवारी 17, 2022 9:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । जळगाव शहर मनपाच्या राजकारणात नगरसेवकांच्या इकडून तिकडे उड्या मारायचे प्रकार सुरूच आहेत. चार दिवसापूर्वी भाजपातून शिवसेनेत येत पुन्हा मी आलेच नसल्याचे सांगत दोन नगरसेविकांना घुमजाव केले होते. अवघ्या काही मिनिटात मोठे घुमजाव समोर आल्यानंतर शिवसेना अलर्ट झाली होती. शिवसेनेने सोमवारच्या महासभेत बहुमताने सर्व विषय मंजूर करून घेतले. शिवसेनेचा तंबू १७ व्या माळ्यावर बसून महासभेत सहभागी झालेला असताना भाजपच्या नगरसेविका मीनाक्षी पाटील या देखील त्याच ठिकाणी बसून होत्या.

mahasabha

जळगाव शहर मनपात भाजपच्या नगरसेवकांना गळाला लावत शिवसेनेने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. शिवसेनेकडे आलेल्या नगरसेवकांपैकी १० नगरसेवक पुन्हा भाजपच्या स्वगृही परतले होते. जळगाव शहर मनपात शिवसेना बहुमतात येणार आणि विकासाच्या कामांना खीळ बसणार हा विषय समोर येऊ लागला होता. शिवसेनेतील अलर्ट लक्षात घेता सभागृह नेते ललित कोल्हे मिशनवर जुळले. तीन महिन्यांच्या प्रयत्नानंतर खेळी यशस्वी ठरली आणि भाजपत गेलेले चार नगरसेवक पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. नगरसेवक प्रवीण कोल्हे, मीना सपकाळे, मीनाक्षी पाटील, प्रिया जोहरे यांनी सेनेची वाट धरली होती.

प्रवेशानंतर लागलीच काही वेळानंतर नगरसेविका मीनाक्षी पाटील यांनी एक पत्र आणि व्हिडीओ सोशल मिडियात शेअर करीत आम्ही भाजपातच असून पालकमंत्री यांना केवळ भेटण्यासाठी गेलो असल्याचे सांगितले होते. आपले बहुमत कमी होणार या भितीने शिवसेनेने पुन्हा खेळी खेळली आणि उषा संतोष पाटील आणि हसीनाबी शेख शरीफ यांना आपल्याकडे खेचून आणले होते. सोमवारी पार पडलेल्या ऑनलाईन महासभेत शिवसेनेने सर्व विषय बहुमताने मंजूर करून घेतले. प्रामुख्याने घनकचरा प्रकल्पाचा विषय मंजूर झाला. शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक आणि पदाधिकारी १७ व्या मजल्यावर बसून महासभेत सहभागी झाले होते. शिवसेनेच्या तंबूत भाजपच्या नगरसेविका मीनाक्षी पाटील या देखील बसलेल्या होत्या. सभेनंतर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी टाळले.

मीनाक्षी पाटील यांचे घुमजाव आणि पुन्हा शिवसेनेच्या तंबूतील उपस्थिती हेच दर्शविते कि, त्यांचा सेनेला छुपा पाठिंबा आहे आणि होता मात्र काही पक्षीय कारणास्तव त्यांनी आपला जाहीर प्रवेश पुन्हा नाकारला असावा. येणाऱ्या काळात असे अनेक नगरसेवक इकडून तिकडे उद्या घेऊ शकतात आणि आपले वक्तव्य देखील बदलू शकतात त्यामुळे जळगावकरांनी त्याकडे दुर्लक्ष करीत विकासकामांसाठी झटणाऱ्या लोकप्रतिनिधींना दाद देणे हाच उत्तम मार्ग आहे.

हे देखील वाचा :

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now