जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कारण गेल्या २२ महिन्यापासून बंद असलेल्या भुसावळ-पुणे (हुतात्मा एक्स्प्रेस), भुसावळ-नागपूर, भुसावळ-कटनी, भुसावळ-देवळाली, भुसावळ-मुंबई या पॅसेंजर (मेमू) गाड्या सुरू कराव्या, यासाठी डीआरएम कार्यालयाने महाव्यवस्थापक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. या गाड्या सुरू झाल्यास लहान रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची साेय हाेईल.

कोरोना पार्श्वभूमीवर मार्च २०२० मध्ये सर्वच रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. पण नंतर रेल्वेकडून सामान्य मेल आणि एक्स्प्रेस गाड्या या विशेष ट्रेन्स म्हणजे स्पेशल ट्रेन्स म्हणून चालवल्या गेल्या. मात्र, पॅसेंजर गाड्या बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. काही दिवसापूर्वीच रेल्वे प्रशासनाने भुसावळ-इगतपुरी, इटारसी व बडनेरा मार्गावर मेमू गाडी सुरू केली आहे. त्यापाठोपाठ १० जानेवारीपासून भुसावळ-देवळाली शटल ऐवजी भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी सुरु झाली.

यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल. कारण, इगतपुरीला उतरून तेथून इतर वाहनांनी कसारा व तेथून लोकलने मुंबईला जाता येईल. दरम्यान, इगतपुरी मेमू पाठोपाठ भुसावळ-पुणे ही हुतात्मा एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी आहे. नाशिक, कल्याण, पनवेल, लाेणावळा येथे जाण्यासाठी ही गाडी सोयीची आहे. सध्या एसटीचा संप व खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी केलेली भाडेवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे हुतात्मा एक्स्प्रेस पुन्हा रुळावर येणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव डीआरएम कार्यालयातून रवाना झाला आहे.
असा पाठवला प्रस्ताव : भुसावळ डीअारएम कार्यालयाने मुंबई येथे जीएम कार्यालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावात भुसावळ येथून पूर्वीप्रमाणे भुसावळ-मुंबई, देवळाली, वर्धा, नागपूर, कटनी आणि भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या परतीच्या मिळून १२ गाड्यांची मागणी केली आहे.
हे देखील वाचा :
- २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान ‘जिगीषा नाट्यसहवास’ चे आयोजन
- JEE अॅडव्हॉन्समध्ये ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
- मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
- डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात
- डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’











