⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

तीन पक्षांच्या सरकारच्या कार्यकाळात कोणीही सुखी नाही ; गिरीश महाजनांची टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२१ । माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मदतीवरून महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तीन पक्षांच्या सरकारच्या कार्यकाळात कोणीही सुखी नाही. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊनही, पंचनामे नाहीत, मंत्र्यांचे दौरे होऊनही दोन वर्षांत राज्य सरकारने शेतकऱ्यांना दमडीचीही मदत दिली नाही, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला.

यावल येथे भाजपच्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियान कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी गिरीश महाजन बोलत होते.  यावेळी महाजन यांनी भाषणास सुरवात करतानाच माजी आमदार, माजी खासदार हरीभाऊ जावळे यांची उणीव भासत असल्याची जाणीव करून दिली.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल स्थापन करून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरु असताना, माजी मंत्री आमदार गिरीष महाजन यांनी अजून एकच बैठक झाली असून भाजपतर्फे चाचपणी सुरू असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. (कै.) हरीभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांच्या अनुपस्थितीविषयी पक्षाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांना विचारणा केली असता, श्री. जावळे मुंबईत असल्याने मेळाव्यास उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अमोल जावळे यांचे नाव मेळावा पत्रिकेवर खूपच खाली असल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा मेळावास्थळी होती.

जिल्ह्यात पक्ष मजबूत- आ.राजूमामा भोळे
याप्रसंगी आमदार राजू मामा भोळे म्हणाले की जिल्ह्यात पक्षाची स्थिती मजबूत असुन आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपाचे सदस्य निवडून येतील,यावल तालुक्यातील सर्वच जागांवर भाजपा विजयी होईल असेही ते म्हणाले. तर नंदकिशोर महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त २ आक्टोबरपर्यंत सलग सोळा दिवस पक्षातर्फे विविध कार्यक्रम घेतले जाणार असल्याची माहीती त्यांनी दिली.यावेळी जिल्हा किसान मोर्चातर्फे निवृत्त सैनिक, व प्रगतशील शेतकरी यांचा सन्मान करण्यात आला.

राज्य सरकारला निकष बदलणे भाग पाडले : खडसे
खासदार रक्षा खडसे यांनी, राज्यातील आघाडी सरकारने निव्वळ कंपनीच्या फायद्यासाठी केळी पीक विमा योजनेचे निकष शेतकरी विरोधात केले. या चुकीच्या निकषांविरूद्ध भाजपने आंदोलन केल्याने राज्य सरकारला पुन्हा जुने निकष लावणे भाग पडल्याचे सांगितले. तर जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त २ ऑक्टोबरपर्यंत सलग सोळा दिवस नियोजित कार्यक्रमांची माहिती दिली.

यांची होती उपस्थिती 
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार गिरीष महाजन होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, जि. प. अध्यक्षा रंजना पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, संघटनमंत्री रवी अनासपुरे उपस्थित होते. प्रसंगी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, सुरेश धनके, पद्माकर महाजन, मसाका अध्यक्ष शरद महाजन, नंदकिशोर महाजन, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, सचिन पानपाटील, जि. प. सदस्य तथा आरोग्य सभापती रवींद्र पाटील, जि. प. सदस्य सविता भालेराव, पं. स. सभापती पल्लवी चौधरी, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, पं. स. गटनेता दीपक पाटील, लक्ष्मी मोरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, प्रदेश सदस्य मीना तडवी, नरेंद्र नारखेडे, रावेर तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतमाता, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन व दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन झाले.