⁠ 
रविवार, मे 19, 2024

तुम्ही कितीही छळ करा, पण…खडसेंचा भाजपवर हल्लाबोल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज भाजपवर पुन्हा तोफ डागली. नाथाभाऊने पक्ष बदलला म्हणून तुम्ही कितीही छळ करा, तुम्हाला किती बदनाम करायचे तितके करा, पण मी काही झुकणारा किंवा घाबरणारा नाही. ईडी माझ्या मागे लागली म्हणजे माझा चेहरा पण पडणारा नाही, असे म्हणत ‘चलते रहना’ अशीच माझी मानसिकता. यांनी कितीही बदनामी केली तरी नाथाभाऊ कसा आहे, हे जनतेला 40 वर्षांत माहिती नाही का? ‘जाहिल यू ही बदनाम है, हमको गम से क्या काम है, ये मुस्कुराती जिंदगी जिंदादिली का नाम है’, असा शेर बोलून दाखवून खडसेंनी भाजपला जोरदार टोला लगावला.

ज्याने भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार केला आहे, त्याला कायद्याने शिक्षा व्हायलाच हवी, या मताचा मी आहे. पण ज्या माणसाच्या चार वेळा चौकशा झाल्या, सीबीआय, इन्कम टॅक्सने केलेल्या चौकशीत काहीही तथ्य निघाले नाही. तरी नंतर अशा पद्धतीने छळणे योग्य नाही. हे निव्वळ राजकारण आहे, हे महाराष्ट्राची जनता जाणून आहे.

विरोधकांना काय वाटेल ते वाटेल पण ‘मी पुन्हा येईल’, असे म्हणत खडसेंनी फडणवीसांचे नाव न घेता त्यांना चिमटा काढला. मी थांबणाऱ्यांमधला नाही. 40 वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार पाहिले आहेत, असे सांगत त्यांनी ‘चलते रहो, रुक जाना नही, तू कही हारके, काटो मे चलके मिलेंगे रास्ते बहार के’, असे म्हटले.