जळगाव लाईव्ह न्यूज । असोदा ते ममुराबाद दरम्यानच्या बायपासवर पुन्हा भीषण अपघात झालाय. उपचारासाठी रुग्णाला कारने नाशिकला घेऊन जात असताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.शांताराम केशव पाटील (५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर) असे मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी ट्रकचालक सतीश अनंतराम ढिल्लो (रा. साकीनाका, मुंबई) याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?
रावेर तालुक्यातील शिंदखेडा येथील ईश्वर शालिक महाजन यांच्या उपचारासाठी त्यांचा मुलगा रामचंद्र महाजन व इतर नातेवाईक हे कारने (क्र. एमएच ४८, पी ०७५५) नाशिकला जात होते. चालक जितेंद्र सोपारकर यांनी वाहन जळगाव शहरातून न नेता शहराबाहेरून जाणाऱ्या बायपासने नेले. काही अंतर पुढे गेल्यानंतर रस्त्याची एक बाजू बंद असल्याने त्यांनी वाहन दुसऱ्या बाजूने घेतले.

त्यावेळी बायपासवर असोदा ते ममुराबाद गावादरम्यान पाळधीकडून जळगावकडे येणाऱ्या ट्रकने (एमएच ०५, डीके ५३१४) वाहनाला समोरून जोरदार धडक दिली. यात ईश्वर महाजन, त्यांचा मुलगा रामचंद्र महाजन, नातेवाईक शांताराम पाटील, निखिल पाटील, जितेंद्र रामदास सोपारकर हे जखमी झाले. या सर्वांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना शांताराम पाटील यांचा मृत्यू झाला.
तालुका पोलिसांनी धडक देणाऱ्या ट्रकसह चालक सतीश अनंतराम ढिल्लो (रा. साकीनाका, मुंबई) ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात याला
आला आहे.









