समान पद्धतीने भौतिक छेडछाड केल्याचे उघडकीस; वीजचोरीस मदत करणारे रॅकेट असल्याचा संशय
जळगाव लाईव्ह न्यूज । स्मार्ट मीटरमध्ये हेतुपुरस्सर छेडछाड करून सुमारे २५ हजार रुपयांची वीजचोरी केल्याची ५ प्रकरणे शिरपूर तालुक्यातील गिधाडे गावात उघडकीस आली आहेत. सर्व प्रकरणांमध्ये स्मार्ट मीटरमध्ये समान पद्धतीने भौतिक छेडछाड केल्याचे निदर्शनास आल्याने, यामागे अज्ञात व्यक्ती/व्यक्तींचे टोळके अथवा वीजचोरीसाठी कार्यरत असलेले रॅकेट असल्याचा संशय आहे. त्यामुळे केवळ संबंधित ग्राहकांविरुद्धच नव्हे, तर स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या व वीजचोरीस मदत करणाऱ्या अज्ञात व्यक्ती/व्यक्तींविरुद्धही शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महावितरणच्या शिरपूर ग्रामीण-२ कक्षाचे सहायक अभियंता प्रितमसिंग परिहार व त्यांच्या सहकाऱ्यांनी २६ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यक्षेत्रातील वीज ग्राहकांच्या स्मार्ट मीटरची तांत्रिक तपासणी करण्यात केली असता पाच ग्राहकांच्या स्मार्ट मीटरमध्ये संशयास्पद व अनधिकृत स्वरूपाची छेडछाड झाल्याचे निदर्शनास आले. सदर तपासणीदरम्यान मीटरच्या बाह्य बॉडी/एनक्लोजरमध्ये प्रत्यक्ष भौतिक छेडछाड करण्यात आल्याचे आढळून आले असून, सदर छेडछाडीचा परिणाम मीटरच्या योग्य व अचूक नोंदणीवर झालेला असल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आले आहे. तसेच संबंधित स्मार्ट मीटरमध्ये मोठ्या प्रमाणात संथ (Slow) नोंदणी आढळून आली.

गिधाडे गावातील सिंदुबाई मधुकर पाटील (मयत) यांच्या नावे मीटर असून वापरकर्ता मनोहर मधुकर पाटील आहेत. हे मीटर ९६.७१ टक्के संथ असून येथे ३९७० रुपयांची वीजचोरी करण्यात आली. सर्जेराव पुना पाटील (मयत) यांच्या नावावरील मीटरचे वापरकर्ता प्रेमराज सर्जेराव पाटील आहेत. हे मीटर ७०.०९ टक्के संथ असून येथे २६३० रुपयांची वीजचोरी करण्यात आली. जितेंद्र भाईदास पाटील या ग्राहकाचे मीटर मीटर ७१.६४ टक्के संथ असून येथे ८२५० रुपयांची वीजचोरी करण्यात आली. नागराज पांडुरंग पाटील या ग्राहकाचे मीटर ७८.६२ टक्के संथ असून येथे ६६७० रुपयांची वीजचोरी करण्यात आली. चतुर बुधा पाटील (मयत) यांच्या नावावरील मीटरचे व वापरकर्ता अमोल रतिलाल पाटील आहेत. हे मीटर ६६.०६ टक्के संथ असून येथे ३३८० रुपयांची वीजचोरी करण्यात आली.
वरील ग्राहकांच्या मीटरची प्रत्यक्ष पाहणी केली असता मीटरच्या बॉडी/एनक्लोजरमध्ये समान स्वरूपाची छेडछाड केल्याचे आढळून आले आहे. सदर छेडछाडीचे स्वरूप व पद्धत एकसारखी असल्यामुळे हा प्रकार केवळ स्वतंत्रपणे झालेली तांत्रिक बिघाडाची घटना नसून, मीटरच्या अचूक नोंदणीमध्ये जाणीवपूर्वक हस्तक्षेप करून वीज वापराची नोंद कमी करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला प्रकार असल्याचा निदर्शनास आले. एकाच परिसरातील/कार्यक्षेत्रातील अनेक स्मार्ट मीटरमध्ये समान स्वरूपाची भौतिक छेडछाड आल्यामुळे, सदर मीटरमध्ये छेडछाड करण्यासाठी एखादी व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट/टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे.
संबंधित ग्राहकांनी स्वतः मीटरमध्ये छेडछाड केली आहे किंवा त्यांच्या संमतीने/सांगण्यावरून कोणत्यातरी बाहेरील व्यक्तीने, खासगी इलेक्ट्रिशियनने, अथवा इतर व्यक्ती/व्यर्तीच्या गटाने सदर छेडछाड केली आहे का, याचा तपास होणे आवश्यक आहे. तसेच वरील पाच प्रकरणांमध्ये समान व्यक्ती/व्यक्तींचा सहभाग आहे का, सदर व्यक्तीने याच पद्धतीने इतर ग्राहकांच्या स्मार्ट मीटरमध्येही छेडछाड केली आहे का आणि या प्रकारामागे संघटित स्वरूपाचे मीटर टॅम्परिंगचे रॅकेट कार्यरत आहे का, याबाबत सखोल पोलीस तपास आवश्यक आहे. सदर कृत्याद्वारे मीटरमध्ये जाणीवपूर्वक छेडछाड करून विद्युत प्रवाहाची योग्य व अचूक नोंदणी होण्यास प्रतिंबध केला असल्याने, हे कृत्य भारतीय विद्युत कायदा, २००३ च्या चे कलम १३५ अन्वये वीजचोरी/मीटरमध्ये छेडछाड करण्याच्या स्वरूपाचे आहे.
तसेच महावितरणच्या मीटरमध्ये अनधिकृतरीत्या हस्तक्षेप करून त्यास इजा/नुकसान किंवा त्याच्या योग्य नोंदणीमध्ये जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्यामुळे कलम १३८ अन्वये हस्तक्षेपाबाबतही गुन्हा आहे. सदर गुन्हा करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने जाणीवपूर्वक मदत, सहकार्य, प्रवृत्त करणे किंवा सदर कृत्य घडवून आणण्यास हातभार लावला असल्यास, अशा व्यक्ती/व्यक्तींविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १५० अन्वये सुधारणेबाबतही कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे वरील पाच ग्राहकांविरुद्ध तसेच सदर मीटरमध्ये प्रत्यक्ष छेडछाड करणाऱ्या, करून देणाऱ्या, मदत करणाऱ्या, प्रवृत्त करणाऱ्या अथवा त्यास सहकार्य करणाऱ्या अज्ञात व्यक्ती/व्यक्तींच्या गटाविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५, १३८ व १५० अन्वये सहायक अभियंता प्रितमसिंग परिहार यांच्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.









