जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२५ । मागच्या काही दिवसापासून जळगाव राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले. यामुळे कापूस, सोयाबीन, मक्यासह इतर पिकांचे नुकसान मोठे झाले. दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होतेय. या चक्रवादळाला ‘मोंथा’ हे नाव सुचवलेल असून या मोंथा चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. यामुळे महाराष्ट्रात अजून काही दिवस पावसाचे ढग कायम राहणार आहे. जळगाव जिल्ह्यात देखील आगामी चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे

गेल्या चार दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी होत असलेल्या अवकाळी पावसाला शेतकरी आता अक्षरशः वैतागले आहेत. पाऊस आणखी किती दिवस छळणार कोण जाणे, असे उद्गार हताशेपोटी शेतकऱ्यांच्या तोंडी आहेत. दरम्यान आज जिल्ह्यात २८ ऑक्टोबरला ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता आहे. तर २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पुन्हा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उन्ह आणि ढगाळ असं मिश्र वातावरण राहणार असून, कमाल तापमानात पुन्हा थोडीशी घट होण्याचे संकेत आहेत.

थंडी आता ३१ ऑक्टोबरनंतरच..
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अजून तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर मात्र, हवामान कोरडे होणार आहे. कोरड्या हवामानामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रीय होऊन जिल्ह्यात थंडीचे जोरदार आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.









