जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव तालुक्यातील वालझिरी पिंपरखेड परिसरात विजेच्या तारा पडून तीन जनावरे जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाले असून, दोन जनावरे आणि स्वतः शेतकरी हे थोडक्यात बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी ज्ञानेश्वर सुरेश ठुबे हे नेहमीप्रमाणे आपल्या गुरांना चारण्यासाठी शेतात घेऊन गेले होते. गुरे पुढे जात असतानाच अचानक विजेच्या तारा खाली आल्याने तीन जनावरे त्यात अडकून तडफडू लागली. ठुबे यांनी आरडाओरड केली असता, आसपासच्या शेतकऱ्यांनी धाव घेत त्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणली.

परंतू तोपर्यंत तीन जनावरे मृत्युमुखी पडली होती. या घटनेमुळे ठुबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पिंपरखेड गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.












