जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२५ । खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे मुंबईहून धुळ्याला जाणारी एक्स्प्रेस वेळापत्रकात 15 जुलैपासून काही बदल करण्यात आले आहेत. ही गाडी पूर्वीप्रमाणेच मुंबईहून ठरलेल्या वेळेसच रवाना होईल, मात्र नव्या वेळापत्रकानुसार चाळीसगाव स्थानकावर ती आता लवकर दाखल होणार आहे.

सध्या गेल्या दोन वर्षांपासून नियमितपणे धावणारी ही गाडी (11011) दररोज दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटते आणि त्याच दिवशी रात्री 8.55 वाजता धुळे स्थानकात पोहोचते. तसेच, धुळे येथून मुंबईकडे धावणारी (11012) गाडी दररोज सकाळी 6.30 वाजता धुळे स्थानकावरून सुटते आणि दुपारी 2.15 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचते.

दरम्यान, आता मुंबई-धुळे एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आला आहे. ही गाडी पूर्वीप्रमाणेच मुंबईहून ठरलेल्या वेळेसच रवाना होईल, मात्र नव्या वेळापत्रकानुसार चाळीसगाव स्थानकावर ती आता 15 मिनिटे लवकर म्हणजेच रात्री 7.10 ऐवजी 6.55 वाजता दाखल होणार आहे. त्याचप्रमाणे, जामदा स्थानकावर रात्री 7.30 ऐवजी 7.15 वाजता, तर शिरूड स्थानकावर 8.06 ऐवजी 7.44 वाजता पोहोचेल. अंतिम थांबा असलेल्या धुळे स्थानकावरही आता ही गाडी रात्री 8.55 ऐवजी 8.25 वाजता पोहोचणार आहे. सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन आपल्या प्रवासाची योजना आखावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.
या स्थानकावर आहे थांबा
या दोन्ही गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जामदा आणि शिरूड या स्थानकांवर दोन्ही दिशांनी थांबा देण्यात आले आहेत.








