जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२५ । हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात में महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणात ५७ टक्के जलसाठा झाला होता. सध्या पूर्णा नदीतूनही आवक होत असल्याने हतनूरमधून विसर्ग केला जात असल्यामुळे शेळगाव बॅरेजमध्येही शनिवारपासून विसर्ग केला जाणार आहे. यामुळे यावल ते जळगाव शेळगाव मार्गे तसेच चोपडा जळगाव खेडी भोकरी हे रस्ते वाहतुकीसाठी बंद होणार आहेत.

हतनूर व शेळगाव बॅरेजच्या पाणलोटक्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. दरम्यान हतनूर धरणात मे महिन्यातच ५७ टक्के जलसाठा झाला होता. यानंतरही पूर्णा नदीच्या पाणलोटक्षेत्रातूनही पाण्याची आवक होत आहे. यामुळे हतनूर धरणातून बुधवारी रात्री एक वाजेपासून दोन दरवाजे अर्धा मिटरने उघडून विसर्ग केला जात आहे. हतनूरमधून सोडलेल्या विसर्गाचे पाणी शेळगाव बॅरेजमध्ये अडवले जात आहे. मात्र बॅरेजमध्ये १५ ऑक्टोबरपर्यंत साठा केला जातो, यामुळे विसर्ग केला जाणार आहे.

शेळगावमधून यंदाच्या मोसमातील पहिला विसर्ग शनिवारी (दि. २१) होईल. धरणातून तब्बल १५०० क्युसेक वेगाने विसर्ग होणार आहे. यामुळे तापीनदीचा जलस्तर वाढेल. परिणामी नदीतून मार्ग असलेल्या किंवा हंगामी पूल असलेल्या यावल-जळगाव (शेळगाव मार्गे) व चोपडा- जळगाव (खेडी भोकरी मार्गे) वाहतुकी करिता असलेले कच्चे रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामुळे वाहनधारकांनी या मार्गांचा वापर करु नये, वाहतुकी करिता पर्यायी मार्गांचा वापर करण्यात यावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता हेमंत सोनवणे यांनी केले आहे.






