Jalgaon : अनुकंपा भरती लवकरात लवकर करा; उमेदवाराचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलांना निवेदन

जानेवारी 23, 2025 12:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हा परिषद, जळगाव अनुकंपाभरती लवकरात लवकर व्हावी यासाठी अनुकंपाधारक उमेदवार जिल्हा परिषदला वर्षभर फेऱ्या मारत आहेत. परंतु जागा रिक्त नाही हे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेतील प्रशासन करत आहे. वय वाढत असल्याने सेवा ज्येष्ठतेतून बाद होण्याची भीती अनुकंपाधारकांना निर्माण झाली आहे.

New Project 9

परिणामी जिल्हाभरातील अनुकंपाधारक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन अनुकंपा भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी न्याय मागत आहेत. त्यात जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजू मामा भोळे, मंत्री संजय सावकारे, आमदार मंगेश दादा चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे यांना भेटून अनुकंपा उमेदवारांनी निवेदन दिली. याची दखल घेऊन आमदार राजू मामा भोळे व आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी ग्रामविकास मंत्री व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जळगांव जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा भरती लवकरात लवकर करावी यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे.

काही प्रतिक्षायादीतील उमेदवार यांचे आई आणि वडील दोघेही हयात नसल्याने त्यांचे आयुष्य अगदी असहाय झालेले आहे. उमेदवारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. डिसेंबर २०२४ च्या जुन्या प्रतिक्षायादीनुसार तब्बल १५५ उमेदवार प्रतिक्षेत असून आणखी संख्या वाढेल अशी परीस्थिती आहे. उमेदवार अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतिक्षायादीत आहेत. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कुटुंबातील वारसाला मदत म्हणून अनुकंपा द्वारे नोकरी दिली जाते. मात्र, यासंबंधी जिल्हा परिषद, प्रशासनास विसर पडतांना दिसतो.

राज्यभर इतर जिल्हा परिषदेत अनुकंपाधारकांना प्राधान्याने शासन नियमानुसार दरवर्षी भरती केली जात आहे. उमेदवारांना दरवर्षी सामावून घेऊन संपूर्ण प्रतिक्षायादी कमी करण्यात येत आहे. ह्या संबंधी प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन भरती करण्याची गरज असल्याचे अनुकंपा धारकांकडून सांगण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now