⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

८ वर्षाची मुक्ताई १४०० वर्षाच्या चांगदेवांची गुरु कशी झाली?

जळगाव लाईव्ह न्यूज : १५ फेब्रुवारी २०२३ : खान्देशात संत चांगदेव-मुक्ताई माघवारी महाशिवरात्री यात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे. ८ वर्षांची मुक्ताई गुरु व १४०० वर्षांच्या योगीराज चांगदेव हे त्यांचे शिष्य, अशा या गुरु-शिष्यांच्या भेटीच्या पर्वावर संत चांगदेव-मुक्ताई माघवारी महाशिवरात्री यात्रेला १५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई समाधीस्थळावर २० फेब्रुवारी पर्यंत ही यात्रा सुरु राहणार असून यात शेकडो दिंड्यांसह सुमारे ८ ते १० लाख वारकरी उपस्थिती देतील असा अंदाज आहे.

महाराष्ट्रात अनेक संत महात्म्ये होऊन गेले. या संतांमध्ये अनेक स्त्री संताचाही समावेश आहे. यातील अग्रगण्य नाव म्हणजे, संत मुक्ताबाई! संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या. संत मुक्ताबाई मुक्ताई या नावाने ओळखल्या जातात. रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आई वडील. संत निवृतीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. मुक्ताबाईंचे विचार फार साधे मात्र परखड होते. मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणून आज देखील त्यांचा नामोल्लेख होतो. मुक्ताबाईंनी ‘ज्ञानबोध’ या ग्रंथाचेही लेखन केले आहे.

योगी चांगदेव वाघावर तर संत मुक्ताबाई भिंतीवर
एका पौराणिक कथे नुसार, असे म्हणतात की योगी चांगदेव १४०० वर्षांचे होते. त्यांना हजारो शिष्य होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि योगशक्तीने ४२ वेळा मृत्यूला परतवले होते. ते महान सिद्ध संत होते पण त्यांना मोक्ष मिळाला नाही. १४०० वर्षांचे झाल्यावर त्यांना गुरु मिळेल हे त्यांच्या योगसामर्थ्याने शिकले होते. संत ज्ञानेश्वरांची व त्यांच्या भावा बहिणीची कीर्ती आणि महिमा चांगदेवांनी ऐकल्यावर त्यांना भेटण्याची इच्छा झाली. पण चांगदेवांच्या शिष्यांनी सांगितले की, तुम्ही मोठे संत आहात आणि ते बालक आहेत. तुम्ही त्याला भेटायला कसे जाऊ शकता? ते तुमच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. हे ऐकून चांगदेव महाराजांचा अहंकार जागृत झाला. मग त्यांनी संत ज्ञानेश्‍वरांना पत्र पाठविले. ते पत्र त्यांची बहीण मुक्ताबाईच्या हातात होते. मुक्ताबाईही संत होत्या. त्याने पत्राला उत्तर दिले – तुझे वय १४०० वर्षे आहे पण तरीही तू या पत्रासारखा कोरा आहेस. हे पत्र वाचून चांगदेव महाराजांची ज्ञानेश्वरांना भेटण्याची उत्सुकता आणखी वाढली. मग आपल्या सिद्धीच्या बळावर तो वाघावर स्वार होऊन ते संत ज्ञानेश्वरांना भेटायला निघाला. त्यांच्यासोबत त्यांचे शिष्यही होते.

संत ज्ञानेश्वरांना जेव्हा कळले की योगी चांगदेव त्यांना भेटायला येत आहेत. तेव्हा त्यांना वाटले की पुढे जाऊन त्यांचे स्वागत करावे. त्यावेळी संत ज्ञानेश्वर ज्या भिंतीवर बसले होते त्यांनी त्या भिंतीला चालण्याचा आदेश दिला. त्या भिंतीवर त्यांची बहीण मुक्ताबाई आणि दोन्ही भाऊ निवृत्तीनाथ आणि सोपानदेवही बसले होते. हे दृष्य पाहून योगी चांगदेव यांचे गर्वहरण झाले आणि त्यानंतर त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांचे शिष्यत्व स्विकारले. या भेटी दरम्यान मुक्ताबाईंनी योगी चांगदेवांना ‘पासष्टी’ चा अर्थ उलगडून दाखविला. मुक्ताबाईच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरुपाची प्राप्ती झाली, तेव्हा त्यांचे १४०० वर्षाचे आयुष्य धन्य झाले. आठ वर्षाची मुक्ताई १४०० वर्षाच्या चांगदेवांची अध्यात्मिक गुरु बनली. कृतार्थतेने योगी चांगदेव म्हणतात, मुक्ताई करे लेइले अंजन.

जागृत देवस्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द
संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृतिनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली. संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या. तो दिवस होता १२ मे १२९७. मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे बांधण्यात आली आहे. हे स्थळ जागृत देवस्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. या स्थळीच दरवर्षी ही यात्रा भरते. यात शेकडो दिंड्या सहगागी होतात. यंदा यात्रोत्वाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जुने मंदिरात ब्लॉक बसवणे, दर्शन रॅम करण्याचे कामे झाली आहेत. त्यामुळे भाविकांना एकेरी मार्गाने दर्शनास बाहेर पडता येणार आहे. त्यामुळे दिंड्या पालख्यांना मुळमंदिरातील भागातूनच करता येईल व्यवस्था केलेली आहे. संत मुक्ताबाई संस्थांनचे मानकरी अध्यक्ष अ‍ॅड. पाटील पादुका पूजन व ध्वज पूजन करून सोहळ्याला सुरुवात केली. यावेळी पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे, व्यवस्थापक उध्दव महाराज जुनारे, हरिभक्त पारायण रतिराम महाराज शास्त्री, अनिल पाटील यांच्यासह भाविक व वारकरी उपस्थित होते.