⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

वर्षभरात जळगाव जिल्ह्यातून ३३ अट्टल गुन्हेगार हद्दपार

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२३ । मटका, जुगार, मद्य तस्करांसह फाळकूट दादा, चोरटे आणि सराईत गुंडांना हद्दपार करण्याची धडक मोहीम पोलिसांनी वर्षभर राबवली. गेल्या वर्षभरात पोलिसांनी जिल्ह्यातील विविध टोळ्यांमधील ३३ अट्टल गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली. प्रांत कार्यालयांसह पोलिस अधीक्षकांनी या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.

‘पुढच्यास ठेच… मागचा शहाणा’ याप्रमाणे मोठ्या गुन्हेगारांवर कारवाई केली, त्यांचे बगलबच्चे आपोआपच थंड पडतात. गुन्हेगारांवर सतत कारवाई केल्यास त्यांच्यावर कायद्याचा धाक राहतो. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात ‘मोका’, ‘झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार स्थानबद्ध’आणि ‘हद्दपारी’ ही पोलिसांकडे असलेली कारवाईची परिणामकारक शस्त्रे आहेत. त्याचा योग्यवेळी वापर करण्याची गरज आहे. या कारवाईचे शस्त्र वापरण्यास सक्षम कागदपत्रे बनवून प्रस्ताव करावे लागतात. मागील वर्षी शंभराच्यावर हद्दपारीचे प्रस्ताव पोलिस प्रशासनाकडून तयार करण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत ३३ गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये काहींना सहा तर काहींना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आला आहे.

किती जणांवर कारवाई?
वर्ष-२०२२
एमपीडीए : ०२
हद्दपार : ३३

काय आहे एमपीडीए कायदा?
महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम -१९८१ म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.

या दोघांवर कारवाई…
राहुल रामचंद्र बऱ्हाटे (३३, रा. रामेश्वर कॉलनी) याच्यावर ९ गुन्हे दाखल असून, त्याला नोव्हेंबर महिन्यात स्थानबद्ध केले गेले होते. तसेच राजेश ऊर्फ दादू एकनाथ निकुंभ (२०, रा. अमळनेर) याच्यावर ११ गुन्हे दाखल असून, नुकतेच याला एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.

भाईगिरी, दादागिरी मोडली…
एमपीडीए कायद्यांतर्गत ज्यांच्यावर कारवाई करण्यात आल्या आहेत, त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, घरफोडी, आर्म ॲक्ट, दुखापत करणे, दंगल घडविणे, गृह अतिक्रमण, सरकारी नोकरांवर हल्ला, धमकी देणे यासह इतर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या या विघातक कृत्यामुळे त्यांची शहरात दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्या गुन्ह्यांचा आलेख व वाढलेली दादागिरी, गुंडगिरी बघून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.