जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी जिल्ह्याच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी पाहायला मिळाल्या. अंतिम क्षणापर्यंत रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर तब्बल १६ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. यामुळे या निवडणुकीतील चुरस कमालीची वाढली असून जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड उत्कंठा आणि लगबग पाहायला मिळाली. विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांच्या गर्दीने परिसर गजबजून गेला होता. जोरदार घोषणाबाजी आणि शक्तीप्रदर्शनामुळे संपूर्ण परिसरात राजकीय माहोल तयार झाला होता. यंदाच्या विधानपरिषद निवडणुकीत प्रमुख पक्षांसह काही अपक्ष उमेदवारांनीही रिंगणात उतरल्यामुळे लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

या उमेदवारांनी अर्ज दाखल केला?
महायुतीकडून भाजपचे नंदकिशोर (नंदू) महाजन यांनी अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे गट) चे शरद तायडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला. या दोन्ही प्रमुख उमेदवारांमुळे मुख्य लढत कोणत्या दिशेने जाणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
याशिवाय अनेक इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणुकीत रंग भरला आहे. प्रवीण पाटील, निलेश चौधरी, आसिफ मोहम्मद, सुनील जंगले, शेख दानिश, जावेद इकबाल, सचिन चौधरी, अनिल चौधरी, रेश्मा काळे, दीपक धांडे, निलेश झोपे, कलीमखान मनियार, हितेंद्र देशमुख आणि घृष्णेश्वर पाटील यांच्यासह इतर उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत.
विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाशी संबंधित नगरसेविका रेश्मा काळे तसेच भुसावळचे दीपक धांडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे काही मतांच्या समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष छाननी प्रक्रियेकडे लागले आहे. त्यानंतर अर्ज माघारीच्या कालावधीत कोणते उमेदवार माघार घेतात आणि अंतिम रिंगणात किती उमेदवार राहतात, यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे.
सध्या तरी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांमध्येही या निवडणुकीबाबत उत्सुकता वाढताना दिसत आहे. आगामी काही दिवसांत घडणाऱ्या राजकीय हालचालींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








