⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

बापरे! जळगावात मोकाट कुत्र्यांनी 11 बकऱ्यांचा पाडला फडशा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२४ । जळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच दरम्यान भटक्या कुत्र्यांनी बंद गोठ्यामधील ११ बकऱ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची धक्कादायक घटना शहरातील असोदारोड, वडामया नगरामध्ये घडलीय. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पशुपालकाचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत शासनाकडून भरपाई मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

जळगाव शहरातील असोदा रोडवरील वडामयानगर येथे प्रकाश चिंतामण कोळी (वय ४५) हे कुटुंबासह वास्तव्यास असून त्यांनी त्यांच्या घराजवळ एक गोठा तयार केला आहे. त्या ठिकाणी त्यांनी १३ बकऱ्या पाळल्या असून त्यापासून मिळणाऱ्या साधनांवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.

दरम्यान शनिवारी ३० मार्च रोजी रात्री त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये दहा वाजेच्या सुमारास सर्व बकऱ्या व त्यांचे काही पिल्ले बांधून ठेवले होते. मात्र मध्यरात्री दुसऱ्या दिवशी भटक्या कुत्र्यांनी बंद गोठ्यात घुसून बकऱ्यांवर हल्ला केला. त्यात काही पिल्लांसह अकरा बकऱ्या ठार झाल्या आहेत. यात पशुपालक प्रकाश कोळी यांचं दीड लाख रुपयाचे नुकसान झाले असून त्यांना नुकसानी प्रकरणी शासनाकडून भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी वडामया नगरामधील ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, जळगाव शहरात गेल्या अनेक दिवसापासून मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. त्यात शहरातील विविध भागात अनेकांना चावा घेतल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट भटक्या कुत्रांचा त्रास वाढला असून नागरिकांच्या जिवाला धोका तयार झाला आहे. तरी देखील महानगरपालिकेकडून यावर कुठलाही बंदोबस्त केला जात नसल्याचं दिसून येत आहे.