⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

राजकारण्यांना शैक्षणिक संस्था काढण्यात रस आहे उद्योग आणण्यात नाही

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । आपल्या राजकारण्यांना शैक्षणीक संस्था काढण्यात रस आहे उद्योग आणण्यात नाही अश्या शब्दात जळगावातील उद्योजकांनी जळगाव लाईव्हशी बोलताना आपला क्रोध प्रगट केला. याच बरोबर जळगावमध्ये जर नवीन उद्योग आणायचे असतील तर त्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती लागते ती राजकीय इच्छाशक्ती जिल्ह्यात नसल्यामुळे जळगावत उद्योग येत नाहीत. असेही असे उद्योजक म्हणाले

याबाबत जळगाव लाईव्हने जिल्ह्यातील काही उद्योजकांशी संवाद साधला असतात खालील प्रमुख मुद्दे समोर आले.

उद्योजक प्रमोद संचेती म्हणाले की, जळगावात उद्योजकांना पोषक वातावरण मिळत नाही. वीज येत जात असते. तिचा काहीही ताळमेळ नाही. जळगाव मध्ये असलेले जमिनीचे दर हे प्रचंड आहेत. पर्यायी उद्योजक या ठिकाणी येण्यास टाळाटाळ करतात. इकडे उद्योग करण्यापेक्षा आपण इतर ठिकाणी उद्योग करावा असे आम्हाला कित्येकदा वाटते. या मागच एक प्रमुख कारण म्हणजे राजकारण्यांचे दुर्लक्ष. राजकारण्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे जळगावचा औद्योगिक विकास होऊ शकला नाही. मात्र आता जळगाव औद्योगिक विकास करणे अतिशय गरजेचे आहे.

उद्योजक संतोष इंगळे यांच्या मते, जळगाव एमआयडीसी जवळूनच जर महामार्ग गेला असता तर याचा थेट फायदा उद्योगांना झाला असता मात्र ते झालेले नाही. प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे हे खरे. याच बरोबर इतर शहरांच्या तुलनेत आपल्या शहरात उद्योजक येऊ इच्छित नाहीत कारण आपल्या कडे तितक्या सोइ नाहीत. आपल्या कडे नवीन उद्योग आकर्षित केले जात नाहीत. आपल्याकडच्या राजकारण्यांना स्वतःचे कॉलेज आणि शैक्षणीक संस्था वाढवण्यात आणि बांधण्यात रस आहे मात्र उद्योग आणण्यात नाही. पर्यायी आपल्याकडे नवीन उद्योग येत नाहीत.

उद्योजक आदर्श कोठारी म्हणतात की, आधीच्या काळी आपल्याकडे उद्योग येत होते. मात्र कार्यक्षम कामगारवर्ग आपल्याकडे नसल्याने आणि जमिनींचे दर खूप जास्त असल्याने हे उद्योग परत गेले. नवीन उद्योग आले की त्यांना नवीन नवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. शासन स्तरावर कोणतीही ठोस उपायोजना करण्यात येत नसल्यामुळे उद्योग निघून जात आहेत. आणि सर्वात महत्वाची असणारी राजकीय इच्छा शक्ती नसल्याने आपल्याकडे उद्योग येऊ शकले नाहीत.

उद्योजक रवींद्र अत्तरदे यांच्या मते, जळगावच्या बाजूला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याचा औद्योगिक विकास होतो मात्र जळगावमध्ये तो होत नाही.जळगावात पायाभूत सुविधा नाहीत. एमआयडीसीमध्ये सर्रास चोऱ्या होतात. जमिनीचे दर खूप जास्त आहेत. याकडे कोणाचेच लक्ष नाही. एमआयडीसी मोठी करायची असेल तर नवीन उद्योग येणे गरजेचे आहेत. मात्र राजकीय उदासीनतेमुळे ते येत नाहीत. जास्तीत जास्त उद्योग या ठिकाणी येतील यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.