जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२२ । माझ्या राजकीय कार्यकीर्दीत राजकारणात मी कोणाला हार घातला नाही. ना कोणाचे फलक लावले नाहीत, स्वतःचेही लावले नाहीत. तरीही मी निवडून आलो. पुढच्या निवडणुकीतही मी काही फलक, कट आऊट लावणार नाही, कोणाला चहापाणी देणार नाही. मत द्यायचे तर द्या. लोकांना काम करणारे नेते हवे असतात आणि त्यांना ते मत देतात असे वक्तव्य करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक लढवण्याचे सुतोवाच केले.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदवीदान समारंभात गडकरी बोलत होते. आपल्या भाषणात गडकरी यांनी या संस्थेच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाकरिता, देशासाठी कसा होईल, टाकाऊपासून त्याचे रूपांतर संपत्तीत कसे होईल यासाठी संशोधन करून नवीन संकल्पना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमलात आणाव्यात असे आवाहन केले.
अमिताभ बच्चन यांची तक्रार नगरपालिका व महापालिकांमध्ये जेवढी गुणवत्ता हवी तेवढी गुणवत्ता दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. दहा दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी पावसाळ्यात जुहू अंधेरीमध्ये पाणी साचत असल्याचे सांगितले. समुद्रापेक्षा मुंबईची पातळी खाली आहे. त्यामुळे पाणी साचणारच, पण जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान, नियोजन जर नगरपालिका आणि महानगरपालिकेला दिले तर हा प्रश्न राहणार नाही. त्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही. तर ते काम कसे करणार, असा प्रश्नही त्यांनी केला