जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडतच आहे. यातच अमळनेरातून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. ज्यात वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावून ‛भाग्यश्री’ ठरलेल्या लेकीचा अज्ञात वाहनाने कट मारल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना अमळनेर धुळे रस्त्यावर लोंढवे फाट्यानजीक घडली. भाग्यश्री दीपक पाटील (वय १८, रा. जानवे, ता. अमळनेर) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव असून याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत असे की, अमळनेर तालुक्यातील जानवे येथील भाग्यश्री पाटील ही तरुणी तिच्या वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावत होती. ती नेहमी मोटरसायकल ला दुधाचे कॅन बांधून एकटी जानव्याहून कधी धुळे तर कधी अमळनेर येत असे. दरम्यान नेहमीप्रमाणे भाग्यश्री १२ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मोटरसायकल (क्रमांक एम एच १९ ,ई बी ६०२७) वर दुधाचे कॅन घेऊन अमळनेर येत असताना लोंढवे शिवारात अज्ञात वाहनाने कट मारला. यामुळे मोटरसायकल रस्त्यावर आडव्या पडलेल्या झाडावर जाऊन आदळल्याने खाली पडून भाग्यश्रीच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला होता.
भूषण पाटील यांनी जानवे गावात माहिती कळवल्यावर गावातील लोकांनी तिला उचलून दवाखाण्यात नेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मृत्यूच्या घटनेने जानवेसह परिसरात हळहळ व्यक्ती होत आहे. नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मोटरसायकलवर दूध वाहता वाहता भाग्यश्री ने जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते. आठ दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल लागून भाग्यश्री उत्तीर्ण झाली होती. तिला पोलीस खात्यात जायचे होते. मात्र काळाने स्वप्नपूर्तीपूर्वीच तिला हिरावून नेले.